। उरण । घन:श्याम कडू ।
उरणमध्ये पडणार्या मुसळधार पावसामुळे रानसई धरणाच्या पाण्याची पातळी वाढली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर रानसई धरणाची पातळी वाढून धरण वाहू लागेल. त्यामुळे धरण परिसरात न जाण्याचा इशारा एमआयडीसीचे उरण कार्यालयाचे उपअभियंता चौधरी यांनी दिला आहे.
गेल्या आठवड्यात कडक उन्हामुळे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आठवड्यातून मंगळवार व शुक्रवार असे दोन दिवस पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु पावसाने जोरदार सुरुवात केल्याने पाणी टंचाईची समस्या दूर झाली आहे.
या वर्षी जून महिन्यातच पावसाने दडी मारली होती. परंतु जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने झोडपून काढले आहे. गेली 4 ते 5 दिवस पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. रानसई धरणाची उंची 116.6 फूट असून मुसळधार पावसामुळे पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे.
सध्या धरणात पाण्याचा साठा 115.6 फूट झाला आहे. यामुळे पावसाचा जोर असाच कायम राहिला तर उद्यापर्यंत रानसई धरण भरून वाहू लागेल, असा विश्वास एमआयडीसी उरण कार्यालयाचे उपअभियंता चौधरी यांनी व्यक्त केला आहे.