| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील अलिबाग नगरपरिषदच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पातंर्गत भूमिगत विद्युत प्रकल्प प्रणालीचे काम संथगतीने चालू असल्याचे आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी विशेष उल्लेखाद्वारे सभागृहाच्या निदर्शनास आणले.
या भूमिगत वीज वाहिनी योजनेत अलिबाग नगरपरिषद जवळील मौजे चेंढरे हे गाव पूर्णतः समाविष्ट करण्यात आले आहे. भूमिगत केबल टाकण्यासाठी ट्रॅचिंग व ट्रॅच लेस जमिनीत आडवे ड्रिलिंग करून भूमिगत वाहिन्या करण्याचे असतानाही चेंढरे व वरसोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये रस्ता खोदून भूमिगत विद्युत वाहिनी टाकून सदर रस्ता हा माती- दगड भराव करून बूजविण्यात आलेले आहेत. त्यामुळे चेंढरे व वरसोली या ग्रामपंचायत हद्दीतील नुकतेच नव्याने दुरूस्त करण्यात आलेले रस्ते खोदून सदर रस्ते वाहतुकीसाठी नादुरूस्त करण्याचे काम येथील ठेकेदाराने केल्याने सदर ग्रामपंचायतीसह शासनाचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक व सार्वजनिक दळणवळण मालमत्तेचे नुकसान झालेले आहे, असे त्यांनी निदर्शनास आणले.
सबब सदर झालेल्या नुकसानीस संबंधीत ठेकेदाराला जबाबदार धरून नादुरूस्त झालेले सर्व रस्ते ठेकेदाराकडून नव्याने तयार करून घ्यावेत व भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्यासाठी ट्रेचिंग व ट्रेंच लेस जमिनीत आडवे ड्रिलिंग या पध्दतीचा वापर करून सदर नादुरूस्त रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावे असे निर्देश शासनाकडून तातडीने देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
सदर नादुरूस्त झालेले रस्ते संबंधीत ठेकेदाराने दुरूस्त न केल्यास त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याने फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. यासाठी शासनाचे या महत्वाच्या व गंभीर बाबीकडे लक्ष वेधून विशेष उल्लेखाद्वारे मागणी करीत असल्याचे सांगितले.