शिंदे गट ‘अपात्र’
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या उमेदवारी अर्ज छाननीत शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. बोर्ली पंचतन जिल्हा परिषद मतदारसंघातून शिंदे गटाकडून उमेदवारी दाखल केलेले मंगल पाभरेकर यांचा अर्ज छाननीत अवैध ठरवण्यात आला आहे. त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यात शिंदे गट अपात्र ठरल्याची चर्चा आहे.
श्रीवर्धन तालुक्यात आराठी आणि बोर्ली पंचतन या दोन जिल्हा परिषद जागांसह दिघी, बोर्ली पंचतन, आराठी आणि बागमांडला या चार पंचायत समिती जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी एकूण 38 हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. 16 ते 21 जानेवारी या कालावधीत अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली.
बुधवारपर्यंत दाखल झालेल्या अर्जांची छाननी गुरुवारी करण्यात आली. या छाननीत जिल्हा परिषदेचा एक व पंचायत समितीचे दोन असे एकूण तीन अर्ज अवैध ठरवण्यात आले. यामध्ये बोर्ली पंचतन जिल्हा परिषद मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार मंगल पाभरेकर, तर दिघी पंचायत समिती मतदारसंघातील प्रथमेश नाकती आणि कल्पेश शेलार यांचे अर्ज अपात्र ठरवून बाद करण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे शिंदे गटाला तालुक्यात मोठा दणका बसला असून, बोर्ली पंचतन जिल्हा परिषद मतदारसंघात आता शेकापच्या उमेदवार शारदा नाईक यांच्यासह दोन उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर आराठी जिल्हा परिषद मतदारसंघात सात उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पंचायत समिती मतदारसंघांमध्ये दिघी येथे दहा, बोर्ली पंचतन येथे सहा, आराठी येथे पाच आणि बागमांडला येथे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील या निवडणुकीसाठी येत्या 5 फेब्रुवारी रोजी 80 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, 56 हजार 826 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान, मंगळवार (दि.27) रोजी दुपारी तीन वाजल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार असून, त्यानंतर तालुक्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.







