| महाड | वार्ताहर |
तालुक्यातील 72 गावे दरडीच्या छायेखाली आहेत. पावसाळा तोंडावर आला की दरवर्षीप्रमाणे दरड प्रवण गावांमध्ये जाऊन जनजागृती करण्याला वेग येतो आणि स्थलांतराचे आराखडे कागदावरच राहतात. आता जिल्हा आपत्ती प्रशासन पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे.
तालुक्यात सर्वात पहिली दरड पारमाची येथे सन 1994 मध्ये कोसळल्यानंतर गेल्या 30 वर्षात शासनाला या दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवता आला नाही. जुलै 2021 मध्ये तळीये कोंडाळकरवाडी येथे दरड कोसळल्यानंतर पुन्हा तालुक्यातील दरडग्रस्त गावांच्या स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र दोन वर्षानंतर दरडग्रस्त गावांच्या स्थलांतराचा प्रश्न जैसे थेच आहे. महाड तालुक्यातील पारमाची या गावांमध्ये 1994 मध्ये पहिली दरड कोसळल्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीला सुरुवात झाली. 2005 च्या नैसर्गिक आपत्तीमध्ये महाड तालुक्यामध्ये दासगाव, जुई, कोंडीवते व रोहन गावामध्ये दरड कोसळून 192 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर जिओ लॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या वैज्ञानिकांनी रायगड जिल्ह्यातील गावांचा सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली होती.
2021 मध्ये तळीये येथे दरड कोसळून 86 जणांचा मृत्यू झाला होता. तर गतवर्षी इर्शाळवाडीत दरड कोसळून 84 जण गाडले गेले. दरवर्षी जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांचे सर्वेक्षण केल्यानंतर वैज्ञानिकांकडून संभाव्य दरडग्रस्त गावांची यादी प्रसिद्ध केली जाते. जुलै 2021 मध्ये तळीये कोंडाळकरवाडी येथे दरड कोसळली. मात्र, या गावाचा दरड प्रवण गावांमध्ये समावेश नव्हता. त्यामुळे पुन्हा महाड तालुक्याचा भुवैज्ञानिकांकडून सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार पूर्वीच्या 49 गावांमध्ये आणखी 23 गावांचा समावेश करण्यात आला. तळीयेची घटना ताजी असेपर्यंत प्रशासनाकडून दरडग्रस्त गावांची पाहणी करून तात्पुरती निवारा व्यवस्था व कायमस्वरूपी पुनर्वसनाचे प्रस्ताव पाठवण्यात आले. मात्र, काळ जसा पुढे सरकला तसा प्रशासनाला देखील या गावांच्या पुनर्वसनाचा विसर पडला.
पावसाळा तोंडावर आला की, दरवर्षी प्रमाणे दरडप्रवण गावांमध्ये जाऊन जनजागृती करण्याला वेग येत असतो. या गावातील रहिवाशांकडूनही आपली पारंपारिक गावातील घरे आणि शेतीवाडी सोडण्यास फारसा उत्साह नसतो. त्यामुळे प्रशासनाकडून कितीही आवाहन विनंत्या केल्या, तरी हे ग्रामस्थ आपली घरे सोडत नाहीत. त्यामुळे या दरडग्रस्त गावातील जनतेची सुरक्षा रामभरोसेच राहीली आहे. यावर्षी हवामान खात्याने सरासरी पेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे दरडग्रस्त गावांतील जनतेचा धोका वाढला आहे. अतिवृष्टीच्या दिवसात या गावांतील जनतेला वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याचे फार मोठे आव्हान प्रशासनासमोर राहणार आहे.