। मुंबई । प्रतिनिधी ।
केंद्र सरकारडून मध्यमवर्गीयांना मधाचे बोट लावण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत यांनी केली आहे. तसेच, हे देशाचे बजेट नसून निवडणुकीचे बजेट आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
रविवारी मुबंईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, हा बजेट म्हणजे अत्यानंद, लोकांनी उड्या मारावे असे काही नाही. हे भाजपचेच भक्त उड्या मारत आहेत. प्रत्येकाने आपापल्या परीने या अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले आहे. कालच्या निवडणुकीत मध्यमवर्गीयांची मते भाजपला पडलेली नाहीत. ईव्हीएमच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांची जी मतं चोरली, आणि ज्यामुळे मध्यमवर्गीय जो धक्क्यात आहे, त्या मध्यमवर्गीयांना मधाचे बोट लावण्याचा प्रयत्न आहे. प्रत्यक्षात या कागदावरच्या बजेटमधून लोकांना काय मिळतं काय नाही मिळत यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. आता जे अर्थतज्ज्ञ आहेत त्यांची भाषणे ऐकायची आहेत. प्रत्यक्षात काय होईल यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले की, बिहारच्या तुलनेत महाराष्ट्रासारख्या राज्याला काय मिळाले? मोदींचे प्रत्येक बजेट हे राज्याच्या विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून केलेले असते. भविष्यात बिहारमध्ये निवडणूका आहेत त्यामुळे बिहारवर वर्षाव झाला आहे. जिथे भाजपचे राज्य नाही, जसे की तमिळनाडू, केरळ, कर्नाटक किंवा महाराष्ट्र असेल तिथे तोंडाला पाने पुसायची आणि पुढे जायचे. आणि भाजपचे जे अंधभक्त आहेत ते टाळ वाजवत बसतात, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना बजेट कळालेलेच नाही. बजेट कळायला किमान 72 तास जावे लागतात. देशाचे बजेट फक्त आकडे आणि घोषणांवर चालत नाही. आम्हाला बजेट कळायला नानी पालखीवाला यांचे भाषण ऐकायला जावे लागत होते. वानखेडे स्टेडियमवर त्यांचे भाषण आम्ही ऐकायचो तेव्हा आम्हाला ते बजेट कळायचे. हे सगळे काय चिंतामणराव देशमुख की रघुराम राजन आहेत का? असेही संजय राऊत म्हणाले आहेत.