| वावोशी । वार्ताहर ।
उन्हाळ्याचे दिवस सुरू असून छत्तिशी विभागातील बर्याच गावामध्ये नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असताना एकीकडे मात्र तांबाटी ग्रामपंचायत हद्दीतील डोणवत नाक्यावर पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी फुटून हजारो लीटर पाणी वाया गेल्याचे भीषण दृश्य समोर आले आहे आणि विशेष म्हणजे हे पाणी दोन दिवसांपासून वाहत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. अशातच येथील प्रशासन देखील किती बेफिकीर व निष्काळजी वृत्तीचे आहे हे दिसून आले आहे.
मागील महिन्यापूर्वीच आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते डोणवत ते मिरकुटवाडी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले असून या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे आणि डोणवत नाक्यावरच या रस्त्याच्या कडेला ही जलवाहिनी फुटल्याने सर्वत्र पाणीच पाणी झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे या रस्त्याला पाण्याने भरलेल्या डबक्याचे स्वरूप येऊन सर्वत्र चिखल तयार झाल्याने येणार्या जाणार्या नागरिकांना व वाहनांना देखील वाहतूक करताना त्रासाला सामोरे जावे लागले. सदर परिस्थितीत मात्र या रस्त्याच्या ठेकेदारांचे देखील या रस्त्याकडे दुर्लक्ष असल्याचे समोर आले. तरी सदरील माहिती आमच्या प्रतिनिधी ने संबंधित विभागातील ग्रामपंचायत सदस्यांना फोन वरून संपर्क करून सांगितल्याने सदरील पाणीपुरवठा थांबविण्यात आला. सदरील परिस्थिती सुरळीत करण्यात आली असली तरी याबाबत येथील ग्रामपंचायत प्रशासन व या कामाचे ठेकेदार किती निष्काळजी व बेजबाबदार आहेत हे समोर आले आहे.