राज्यातील हिवताप रुग्णसंख्या हजारांच्या घरात

। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे हिवतापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नियमित पावसाळा सुरू होण्याआधीच ८ जूनपर्यत राज्यभरात ३ हजार ५८० रुग्णांना हिवतापाची लागण झाली असून या वर्षीही हिवतापाचा प्रादुर्भाव जास्त असण्याची शक्यता आहे.

२०२० मध्ये हिवताप रुग्णसंख्या १२ हजार ९०९ होती. २०२१ मध्ये १९ हजार ३०४ रुग्ण नोंदले गेले. तर, २०२२ मध्ये जानेवारी ते ८ जून या काळात रुग्णसंख्या ३ हजार ५८० वर गेली असून ३ मृत्यूंची नोंद झाली आहे.

जाणून घ्या अन्य पावसाळी आजार
पाऊस नियमित सुरू झालेला नसला तरी हिवतापासोबतच डेंग्यू, चिकनगुनिया या आजारांनीही डोके वर काढायला सुरूवात केली आहे. जानेवारी ते ८ जून या काळात राज्यभरात डेंग्यूचे ८४३, तर चिकनगुनियाचे ३५७ रुग्ण आढळले. तसेच ‘स्वाईन फ्लू’चे आठ आणि लेप्टोच्या २४ रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यभरात अजून पावसाला फारशी सुरुवात झालेली नाही. परंतु रुग्णसंख्या काही प्रमाणात निश्चितच वाढली आहे. पाऊस नियमित सुरु झाल्यावर रुग्णसंख्येत आणखी वाढ होईल. साथरोग नियंत्रणासाठी दैनंदिन सर्वेक्षणासह चाचण्यांसाठी आवश्यक संचाची उपलब्धता केलेली आहे.

डॉ.प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण विभाग प्रमुख

Exit mobile version