तीन दिवसात साडेतीन कोटींच्या वीजचोर्‍या उघडकीस


महावितरणच्या भरारी पथकाची विशेष मोहीम

| मुंबई | प्रतिनिधी |

महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने राबविलेल्या तीन दिवसीय विशेष तपासणी मोहिमेत राज्यात अंदाजे साडेतीन कोटींची तब्बल 383 वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत.

महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागांतर्गत असलेल्या कोकण, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या चारही परिक्षेत्रांमध्ये 24 ते 26 एप्रिलदरम्यान विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण 383 वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणण्यात आलेली आहेत. या तीन दिवसांमध्ये नागपूर परिक्षेत्रांतर्गत सर्वाधिक 121, कोकण परिक्षेत्रात 117, औरंगाबाद परिक्षेत्रात 92 तसेच पुणे परिक्षेत्रांतर्गत 53 वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. या वीजचोरी प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. याप्रकरणी अंदाजे 3 कोटी 50 लाख रूपयांचा दंड आकारण्यात आला असून, पुढील कार्यवाही चालू आहे.

महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक (प्रभारी) मुंबई श्री सुमित कुमार, यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या विशेष तपासणी मोहिमा राबविण्यात येणार असल्याने ग्राहकांनी वीजचोरी न करता विजेचा अधिकृत वापर करून महावितरण कंपनीस सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version