विषारी रसायनामुळे तीन जनावरे दगावली

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

कंपन्यांविरुद्ध कारवाईची शेतकर्‍यांची मागणी

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील रासळ गावात दोन कंपन्यांनी ओढ्यात सोडलेल्या विषारी रासायनामुळे शेतकर्‍याच्या दोन म्हशी व एक पारडू दगावले असून, सहा म्हशी व दोन पारडे गंभीर जखमी झाली आहेत. या घटनेची तक्रार शेतकर्‍याने पाली पोलीस ठाण्यामध्ये गुरुवारी, दि. 29 रोजी दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रासळमधील शेतकरी दिपक खाडे यांनी रविवारी (25) आपली आठ म्हशी व तीन पारडू एस.आय. ग्रुप इंडिया लिमिटेड आणि सनशिल्ड केमिकल्स प्रा. लिमिटेड या कंपन्यांच्या मागील ओढ्यात चरायला सोडली होती. संध्याकाळी जनावरे परतत असताना त्यांना कळाले की, कंपन्यांनी विषारी रासायनिक कचरा ओढ्यात सोडल्यामुळे पाणी दूषित झाले होते. या पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे म्हशी व पारडांची कातडी जळून गेली आणि त्यांना गंभीर इजा झाल्या. त्यातून दोन म्हशी व एक पारडू मृत, तर सहा म्हशी व दोन पारडे जखमी झाली आहेत.

कंपन्यांविरुद्ध तक्रार
या घटनेमुळे शेतकर्‍याला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले असून, त्याने कंपन्यांविरुद्ध कठोर कारवाई आणि नुकसानभरपाईची मागणी केली आहे. पाली पोलीस ठाण्यामध्ये दाखल तक्रारीनंतर पोलीस उपनिरीक्षक व्ही.एन. जिवडे यांच्या नेतृत्वात तपास सुरू आहे.
Exit mobile version