चिपळूण । वार्ताहर ।
अतिवृष्टीच्या काळात संभाव्य पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी चिपळूण तालुक्यात तीन नियंत्रण कक्ष कार्यरत असणार आहेत. तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार केली आहेत. अतिवृष्टीच्या काळात चिपळूण शहरात महापूर येतोच त्याशिवाय ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होते. ग्रामीण भागातील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे नदीकिनारी असलेल्या घरात पाणी शिरण्याचे प्रकार वाढले आहे; मात्र शहरात पूर आल्यानंतर पालिका प्रशासन आणि इतर शासकीय यंत्रणा शहरातील पूरपरिस्थिती हाताळण्यात मग्न होते. त्यामुळे ग्रामीण भागाकडे नेहमी दुर्लक्ष होते. शहरातील जनजीवन पूर्ववत झाल्यानंतर ग्रामीण भागातील पंचनामे सुरू होतात. 22 जुलै 2021 च्या दिवशी झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरात प्रशासनाची तारांबळ उडाली होती. काही अधिकारी आपली घरे स्वच्छ करण्यात मग्न होती. त्यामुळे त्यांना नागरिकांसह लोकप्रतिनिधींच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. या वर्षी अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच जय्यत तयारी सुरू केली आहे.