। अलिबाग । सायली पाटील ।
गणरायाची चाहूल लागताच वातावरणात एक उत्साही चैतन्य निर्माण होणं, घराची सजावट, गणरायाची आरास, मखर आदीसाठी जोरदार तयारी करणं, मनोभावे त्याची पूजा करणं, वाजत-गाजत मिरवणूक काढणं, खोल समुद्रात जाऊन विसर्जन करणं हे दरवर्षी दिसणारं चित्र. मात्र विसर्जनानंतर काय, हे अनेकांना माहितही नसतं. समुद्रात विसर्जन केल्यानंतर गणरायाच्या मुर्तीची होणारी विटंबना न पहावणारी असते आणि म्हणूनच नागांवच्या रूचिर राऊत, अक्षय राऊत, प्रथमेश राऊत या तीन तरुणांनी गणरायाच्या मुर्त्यांची विटंबना होऊ नये, म्हणून पुढाकार घेत समुद्र किनार्यावर आलेल्या सर्व मूर्त्यांचे पुनःश्च विसर्जन करुन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सव म्हटलं की अवघ्या महाराष्ट्राला ओढ लागते ती बाप्पाच्या आगमनाची. बरेच दिवस घराघरात विराजमान असलेल्या या बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आली की प्रत्येकाचेच डोळे पाणावल्यावाचून राहत नाहीत. पण त्याच बाप्पाची मूर्ती जेव्हा विसर्जनानंतर चालता चालता पायाखाली येते तेव्हा मन अगदी हेलावून जाते. अलिबाग समुद्रात विसर्जन झाल्यानंतर लगेचच भग्न पावलेल्या मूर्त्या किनार्यावर आल्या होत्या. समुद्रावर विसर्जनास आलेल्या रूचिर राऊत, अक्षय राऊत, प्रथमेश राऊत या नागावच्या ग्रामस्थांनी त्या भग्न पावलेल्या मूर्त्या उचलून पुन्हा समुद्रात विसर्जित केल्या.
थर्माकोलमुळे प्रदूषण होत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात थर्माकोल डेकोरेशन्स बंद झालेले दिसत आहेत. परंतु बाप्पाच्या पीओपीच्या बनलेल्या मूर्त्यांचे पाण्यात लवकर विघटन होत नाही हे माहीत असूनसुद्धा कित्येक लोक पीओपीच्याच मूर्त्या आणतात. पण विसर्जनाच्या नंतर लगेचच त्या मूर्त्या चालता चालता पायाखाली येतात. याचे भान कोणालाच राहत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. विसर्जन म्हणजे गणपती समुद्रात सोडून घरी जाणे नव्हे, तर त्या मूर्तीचे संपूर्ण विघटन होणे म्हणजे विसर्जन.
पीओपीच्या मूर्त्यांचे पाण्यात लगेच विघटन होत नसल्याने मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण तर होतच परंतू भग्न झालेल्या मूर्त्या या किनाय्रावर आल्याने
बाप्पाचा अनादर केल्यासारखे होते. पर्यावरणाचे संरक्षण करणे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे निदान पुढल्या वर्षीपासून तरी प्रत्येकाने मातीचा, कागदाचा किंवा पाण्यात लगेच विरघळणारा बाप्पा घेऊन यायला हवा.
- मानवजातीनेच केलेल्या प्रत्येक गोष्टीच्या अतिरेकपणाचे पडसाद आज सर्वत्र विविध रूपात पाहायला मिळत आहेत. आणि भग्न पावलेल्या मूर्त्या किनाय्रावर आलेल्या पाहील्या की मानवजातीचा प्रचंड राग येतो. – रुचिर राऊत, नागाव