| पनवेल | प्रतिनिधी |
ऐन उन्हाळ्यात कळंबोली वसाहतीमधील काही भागात समुद्राच्या भरतीचे पाणी घुसल्याचे पाहायला मिळत आहे. पालिकेकडून रस्ते आणि गटाराचे चुकीच्या पद्धतीने सुरु असलेल्या कामामुळे हे पाणी रस्त्यावर आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र युवक आघाडीचे सरचिटणीस अॅड. तुषार पाटील यांनी केला असून, पालिकेने कामात सुधारणा न केल्यास पवासाळ्यात संपूर्ण कळंबोली वसाहत पाण्याखाली जाण्याची शक्यता अॅड. पाटील यांनी व्यक्त केली आहे. समुद्र सपाटीपासून खोलगट भागात वसवण्यात आलेल्या कळंबोली वसाहतीत दर वर्षी पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असतात.
विशेषतः समुद्राला येणार्या भरतीच्या काळात वसाहतीतून वाहणार्या खाडीत समुद्राच्या भरतीचे येणारे पाणी वसाहतीत शिरत असल्याने वसाहतीत अनेकदा पूरपरस्थिती निर्माण होत असते. सिडकोने वसवलेल्या या वसाहतीची भरतीच्या पाण्यापासून सुरक्षा व्हावी याकरिता वसाहतीभोवती हॉलंड देशाच्या धर्तीवर धारण तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. सद्यःस्थितीत वसाहतीभोवती तयार करण्यात आलेले धारण तलाव पूर्णपणे गाळाने भरले असून, वसाहतीत पालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या रस्ते आणि नळ्यांच्या विकासकामांमुळे पाण्याचा योग्य निचरा होऊ शकत नसल्याने सोमवारी वसाहतीमधील काही भाग पाणीमय झाल्याचे पाहायला मिळाले.