ग्रामीण भागात भीतीचे वातावरण
| पोलादपूर | प्रतिनिधी |
वनअधिवासाचे क्षेत्र सोडून मानवीवस्तीमध्ये आलेल्या हिंस्त्र प्राण्यांकडून मानवीजीवन धोक्यात आणले गेल्यास त्याबाबत वनविभागाने कधी कारवाई करायची याबाबत कोणतेही कालमर्यादेचे निकष नसल्याने पोलादपूर तालुक्यातील वन्यपशूंमुळे विशेषत: बिबटयांच्या मुक्तसंचारासह पाळीव प्राण्यांच्या फडशा पाडण्यामुळे ग्रामीण भागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलादपूर तालुक्यातील कालवली गावात वनविभागाकडून कानठळया बसविणार्या फटाक्यांचे वाटप करून बिबटयाला हुसकावून लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटात गेल्या सोमवारी सायंकाळी बिबटयाचे दर्शन झाल्यावर एका मोटारसायकलस्वाराने प्रसंगावधान राखून बिबटयाचे मोबाईलवरून केले. पोलादपूर वाई सुरुर महामार्गावर सध्या रुंदीकरण सुरू असताना वाहतूक देखील सुरू आहे. गेल्या सोमवारी दुपारी वाहनचालकांना उन्हाच्या झळा बसल्याने सायंकाळी अनेक मोटारसायकलस्वारांनी इप्सित स्थळी जाणे पसंत केले. मात्र, दाभिळटोक ते आंबेमाचीदरम्यानच्या एका वळणावर संरक्षक कठडयांपलिकडे मोटारसायकलच्या हेडलाईटमुळे लाल रंगाचे दोन डोळे दिसल्याने प्रसंगावधान दाखवून मोटारसायकलस्वारांनी तातडीने मोटारसायकल थांबवित मोबाईलने व्हिडिओ शूटिंग करीत अंदाज घेतला. यावेळी संरक्षक कठडयांलगत एक बिबटया उजेडाचा अंदाज घेत दरीच्या बाजुच्या कठडयाखालून आंबेनळी घाटरस्ता ओलांडून डोंगराकडे वेगाने निघून गेला.
पोलादपूर तालुक्यातील काळवली गावच्या जंगल भागात बिबटया असल्याचे रविवारी रात्री मुख्य रस्त्यावरून जाताना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. दरवर्षी ऐन उन्हाळयातच काळवली पवारवाडी, विठ्ठलवाडीकडे जाणार्या मुख्य रस्त्यावरून रात्रीच्या वेळी जाताना येताना बिबटया निदर्शनास येत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. डोंगर भागात असलेल्या काळवली विठ्ठलवाडी, पवारवाडी व भोसलेवाडी परीसरात घनदाट जंगल असल्याने येथील नागरिकांना बिबटयाचा वावर सुरू झाल्याने भिती निर्माण झाली आहे. विठ्ठलवाडी येथील जंगलात असलेल्या म्हसोबा तलाव 2021 साली झालेल्या अतिवृष्टीमुळे पुर्णत: मातीने बुजून गेल्याने जंगलातील वन्यप्राण्यांनी पाण्यासाठी तळभागाकडे आपला मोर्चा वळवला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वन विभागाकडून घनदाट जंगलात वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली तर वन्यप्राण्यांचे पाण्यासाठी जंगलातून लोकवस्तीकडे येण्याचे प्रमाण कमी होवू शकते, अशी अपेक्षा केली आहे.
वन क्षेत्रपाल राकेश साहू व परीमंडळ अधिकारी बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नियत क्षेत्र अधिकारी संदिप परदेशी व परीमंडळ कर्मचारी यांनी काळवली पाटीलवाडी व हावरे गावात जाऊन बिबटया पळवून लावण्यासाठी फटाक्यांचे वाटप केले तसेच गावातील लहान बालके महिला सह ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत जनजागृती केली आहे. पोलादपूर सारख्या दुर्गम डोंगराळ भागात डोंगर दर्या खोर्यात बिबटयाचा वावर असू शकतो हे वन विभागाने मान्य केले असून नागरिकांनी स्वत:ची संरक्षण आणि दक्षता घेण्यासाठी रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडू नये तसेच काठी व बॅटरीचा आधार घ्यावा असे आवाहनही केले आहे.