| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यावर निसर्गाची कृपावृष्टी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पावसाळ्यातही हजारो पर्यटकांची पाऊले सोलनपाडा धबधब्याकडे पडताना दिसताता.
पावसाळ्यात जामरुंग नावाने नोंद असलेले सोलनपाडा येथील जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाचे धरण ओव्हरफ्लो झाले की त्या भागातील निसर्ग सौंदर्यात भर पडते. त्यामुळे निर्सगप्रेमी सोलनपाडा येथे येऊन ठाण मांडतात. कर्जतपासून 25 किलोमीटर असलेला हा पाझर तलाव आता पर्यटनाचे केंद्र बनले आहे.
1980च्या दशकात जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने जामरुख येथे पाच लाख रुपये खर्चून पाझर तलाव बांधला. 2012 मध्ये या तलावाची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करतांना पाणीसाठा वाढावा यासाठी खोली अधिक करण्यात आली. मातीचा बांधही आणखी मजबूत करण्यात आला. त्यामुळे लहान धरणात रूपांतर झालेल्या या धरणाच्या मुख्य जलाशयात कोणालाही जाण्यास पूर्वी परवानगी नव्हती आणि आजदेखील नाही.परंतु पाटबंधारे विभागाने अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी सांडव्याची केलेली रचना ही पर्यटकांना आकर्षित करणारी आहे.
धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर तेथील अतिरिक्त पाणी बाहेर पडण्याचा मार्ग अधिक भक्कम करतांना सांडवा नव्या पद्धतीने बांधून तयार केला. या सांडव्याचे नवीन रूप हे त्यातून पाणी खाली जाताना आणखी आकर्षक दिसते. 2015 मध्ये पावसाळ्यात पहिल्यांदा या धरणाच्या सांडव्यामधून पाणी भरून वाहू लागले होते आणि पर्यटक तसेच निसगप्रेमी या पाझर तलावाच्या प्रेमात पडले.
सोलनपाडा धरण भरल्यानंतर त्याच्या सांडव्यामधून पाणी बाहेर पडू लागले की त्या क्षणाचा आनंद घेण्यासाठी धरण ओव्हरफ्लो होतानाच अनुभव हजारो वर्षासहल प्रेमींनी गर्दी करीत असतात. त्या ठिकाणी जाण्याचं मर्ग देखील निसर्ग सौंदर्याने भरलेला आहे. रस्त्याच्या आजूबाजूला प्रचंड प्रमाणात हिरवाई आणि आजुबाजूने वाहणारे ओढे, यामुळे त्या भागात पर्यटक आणि निसर्गप्रेमी पोहचल्यावर आनंदी असतो. त्यामुळे धरणाच्या परिसरात पोहचल्यावर कोणताही व्यक्तीला भिजण्याचा मोह रोखू शकत नाही.
त्या धरणाच्या परिसरात पर्यटक पोहचल्यावर धरणाच्या मुख्य जलाशयात जाण्याचा मोह करतात आणि त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. वारंवार होणारे सोलनपाडा धरण परिसर 2016 पासून पर्यटकांसाठी बंद आहे.