। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
मुरूड शहरातील बंदर मार्गावरुन मासळी मार्केट मार्गे एकदरा,राजपुरी गावाकडे जाणार्या मार्गावर मासळी विक्रेत्यांमुळे वाहनांची प्रचंड कोंडी होत असून त्यामुळे अचानक वाहन घुसून जीवघेणा अपघात होण्याची मोठी शक्यता दिसून येत आहे. शनिवार, रविवार किंवा सलग सुट्टीच्या दिवसात आधिक कोंडी होताना दिसून येत असून यावर प्रशासनाने कडक उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांतुन सतत होत आहे.
मासळी विक्रीसाठी मुरूड नगरपरिषदेने लाखो रुपये खर्चून नवीन मार्केट याच ठिकाणी बांधलेले असून मात्र 30 टक्के मासळी विक्रेत्या महिला येथे मासळी विकताना दिसून येतात.70 टक्के मासळी मार्केट बाहेर मुख्य रस्त्यावर बसूनच मासळी विक्री केली जात आहे. यामुळे जंजिरा पाहण्यासाठी राजपुरीकडे जाणार्या महत्त्वाचे मार्गावर सातत्याने वाहनांची कोंडी होऊन प्रकरण हमरीतुमरीवर येत असते.वाद होत असतात. मासळी खरेदीसाठी मोठी गर्दी असते त्यावेळी एखादे वाहन घुसून जीवघेणा अपघात होण्याची दिसत आहे.यावर दूर्लक्ष करून चालणार नाही. वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. दुर्घटना घडेपर्यंत वाट पाहू नका असे मत देखिल ग्राहकातून व्यक्त होत आहे.