। खालापूर । वार्ताहर ।
गेल्या पाच-सहा वर्षांपासून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाची व्यथा या रस्त्याचा वापर करणार्या हजारो प्रवाशांना रोज अनुभवाला मिळते. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग उभारल्यानंतर पुणे- मुंबई दरम्यानचा प्रवास सुपरफास्ट झाला. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या मार्गावरून प्रवास करणे ही वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत आहे.
नेहमीच होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे अपघातात होणारे मृत्यू हे दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी अडीच-तीन तासांत होणार हा प्रवास आता पाच ते सहा तास लागले तरी संपत नाही. घाटात जर अपघात झाला तर मग या कोंडीतच चार-पाच तास जातात. त्यामुळे या ‘एक्स्प्रेसवे’ची वाहतूक कोंडी कधी सुटणार हा प्रश्न आता पुणे-मुंबई प्रवास करणार्या वाहन धारकांना भेडसावत आहे.
पुण्याहून मुंबईला निघाल्यावर पहिल्यांदा कोंडी होणारे ठिकाण म्हणजे उर्से टोल नाका. त्यानंतर लोणावळा व खंडाळा घाट, आडोशीचा बोगदा, मग खालापूर टोल नाका. या ठिकाणी कोंडी झाली तर पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. मुंबईहून पुण्याला येताना खालापूर टोल नाका, लोणावळ्याहून बाहेर पडताना ‘बॉटल नेक’ तयार होतो ते ठिकाण,अमृतांजन पूल आदी ठिकाणी वाहतुकीची कोंडी नियमित होते.
पुण्याहून निघाल्यावर उर्सेजवळ सकाळी 7 ते 9, खालापूरजवळ सकाळी 10 ते 11 तर मुंबईहून निघाल्यावर दुपारी 5 ते रात्री 10 या वेळेत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते.पोलिसांचा अंदाजानुसार पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 60 हजार दररोज दुतर्फा धावणारी वाहने तर 80 ते 90 हजार शनिवारी-रविवारी धावणारी वाहने धावतात.