| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
ग्रामपंचायतींनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन याकडे शासकीय योजना न पाहिल्यास लोक चळवळ म्हणून पाहिल्यास प्रत्येक ग्रामपंचायत आदर्श व स्वच्छ, सुंदर होईल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी बुधवारी (दि १६) पाणी व स्वच्छता विभाग आयोजित ऑनलाइन प्रशिक्षण शिबिरात केले. तसेच ग्रामीण विकासाचा पाया महिला बचत गट असून, सरपंच, ग्रामसेवक यांच्यासोबत बचत गटातील महिलांनी सक्रीय सहभाग घेतल्यास ही चळवळ यशस्वी होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, उप अभियंता, सरपंच व ग्रामसेवक, बचत गटातील महिला, गट समन्वयक, ठेकेदार यांचे दूरस्थ प्रणालीद्वारे प्रशिक्षण शिबिर बुधवारी पार पडले. यावेळी डॉ. किरण पाटील यांनी मार्गदर्शन केले. रायगड जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध कामे सुरु आहेत. घन कचरा व्यवस्थापन मध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने कंपोष्ट खड्डे, गांडूळखत प्रकल्प व नॅडेप खत खड्डे, प्लास्टिक संकलनासाठी शेड, सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डा व परसबागा व स्थिरीकरण तळे, निर्माण करण्यात येत आहेत. ही सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना डॉ. किरण पाटील यांनी यावेळी दिल्या.
घरगुती कचरा व्यवस्थापना बरोबर सार्वजनिक स्तरावरील कचरा व्यवस्थापन अत्यंत गरजेचे आहे. गावपातळीवरील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे घेण्यासाठी जागा निश्चिती बरोबरच गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामासाठी दक्षता घ्यावी व येत्या महिना अखेरिस कामे पूर्ण करावीत, असे पाणी व स्वच्छ्ता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांनी सांगितले.
प्लास्टिक मुळे पक्षी व मासे मृत होतात प्रगती, उन्नती व विकास घडवायचा असेल तर प्लास्टिक बॉटल ऐवजी स्टीलची बॉटल वापरावी. कचरा वर्गीकरणासाठी त्रीकुंडीची पद्धत म्हणजे ओला कचरा, सुका कचरा व वेगळी प्लास्टिक रद्दी यासाठी तीन कचरा कुंड्या वापरल्यास निसर्गात जाणारा प्लास्टिक कचरा कमी होऊन पर्यावरणाचे संवर्धन होईल असे सागर मित्र संस्थेचे सह अध्यक्ष विनोद बोधनकर यांनी सांगितले.
यावेळी साधन व्यक्ती व हुमगाव चे माजी सरपंच शिवाजी बार्शी, साधन व्यक्ती गणेश खातू, उंबरे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गणेश मोरे यांनी प्रकल्प अंमल बजावणी बावत सविस्तर माहिती दिली. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. संवाद तज्ञ सुरेश पाटील यानी आभार मानले. या प्रशिक्षण शिबिरात सुमारे ३ हजार जण सहभागी झाले होते.