अनुसूचित जमातीची जातप्रमाणपत्रे मिळण्यासाठी आंदोलन
| रायगड | खास प्रतिनिधी |
सरकारच्या धोरणाविरोधात आदिवासी-कोळी समाज हा चांगलाच आक्रमक झाला आहे. राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून 23 जानेवारीला ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढून धडकणार आहेत. अनुसूचित जमातीची जातप्रमाणपत्रे व वैधता प्रमाणपत्रे मिळालीच पाहिजेत, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे आदिवासी कोळी समाजाच्या राज्यस्तरीय सभेत याबाबतचा ठराव करण्यात आला होता. 23 जानेवारी रोजी सकाळी अलिबाग कोळीवाडा येथील श्री खंडोबा मंदिरापासून मूक मोर्चाला सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचल्यावर अन्नत्याग आणि साखळी उपोषण करण्यात येणार आहे. त्यावेळी सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे, असे समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष जयवंत पोकळे यांनी सांगितले.
मराठी भाषीक आदिवासी-कोळी जमातींवर सातत्याने अन्याय करण्यात येत आहे. गुजरात, मध्यप्रदेश, ओडिशासह अन्य परप्रांतातून महाराष्ट्रात स्थलांतरीत झालेल्या आदिवासींच्या एका गटाचा सरकारवर दबाव आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. सरकार याबाबतीमध्ये बोटचेपे धोरण स्वीकारत असल्याने आदिवासी-कोळी समाजावर अन्याय होत आहे.