डॉ. जयपाल पाटील
| अलिबाग | वार्ताहर |
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास मंत्रालयातर्फे आदिवासी आश्रमशाळेतील मुलांना धनुर्विद्या शिकविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे आदिवासी सेवक जयपाल पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.
रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील आदिवासी प्रकल्पांतर्गत 14 आश्रमशाळांतील 5300 विद्यार्थ्यांना आपत्ती सुरक्षाविषयक प्रशिक्षण दिले आहे, अशी माहिती जयपाल पाटील यांनी दिली. ही मुले नेमबाजीमध्ये अतिशय निष्णात आहेत. त्यांना आश्रमशाळेत इयत्ता पाचवीपासून धनुर्विद्येचे प्रशिक्षण दिले, तर ती देशपातळीवर नेमबाजीमध्ये प्रगती करू शकतात. पुढे ऑलिम्पिकमध्येही पोहोचू शकतात. यासाठी शाळेमध्ये असलेल्या क्रीडा शिक्षकांना धनुर्विद्येबाबत प्रशिक्षण दिले, प्रत्येक शाळेत धनुर्विद्येचा संच दिला तर भविष्यात ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातील आदिवासी मुले, मुली निश्चितच नावलौकिक मिळवतील, असे जयपाल पाटील यांनी पत्राद्वारे डॉ. कुमार गावित यांच्या निदर्शनास आणून दिले. हे पत्र माहितीसाठी राज्यपाल रमेश बैस यांनाही देण्यात आल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.