96 एकर जमीन 30 वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिल्याने संताप; लाखाचीवाडीच्या शंभरहून अधिक आदिवासींची प्रांत कार्यालयावर धडक
| नेरळ | प्रतिनिधी |
ज्या जमिनीवर आदिवासींची घरे, शेती आणि वर्षानुवर्षांची वहिवाट आहे, तीच जमीन टोरंट वीज कंपनीच्या प्रकल्पासाठी देण्यात आल्याने कर्जत तालुक्यात संतापाची ठिणगी पडली आहे. पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायत हद्दीतील साई डोंगर भागात प्रस्तावित टोरंट पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पासाठी शासनाच्या ताब्यातील सुमारे 96 एकर जमीन 30 वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या जमिनीवर आदिवासींची घरे आणि शेती असल्याने ‘आमची घरे मोडून प्रकल्प उभारू देणार नाही’, असा आक्रमक पवित्रा घेत लाखाचीवाडीतील शंभरहून अधिक आदिवासींनी कर्जत प्रांत कार्यालयावर धडक दिली.
सावळे ग्रामपंचायत हद्दीतील लाखाचीवाडी येथील सर्व्हे क्रमांक 14 मधील गुरचरण जमीन टोरंट कंपनीला 30 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याच परिसरात आदिवासी कुटुंबांची घरे असून, अनेक वर्षांपासून ते नाचणी, वरी तसेच पावसाळी कंदमुळांची लागवड करून उदरनिर्वाह करतात. सावळे ते कोठिंबे गावाकडे जाणारा रस्ताही याच क्षेत्रातून जात असल्याने या जमिनीचा प्रश्न केवळ घरांचा नसून आदिवासींच्या जगण्याचा आणि वहिवाटीचा प्रश्न असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
जमीन टोरंटला देण्यात आल्याची माहिती मिळताच लाखाचीवाडीतील ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख बाजीराव दळवी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे यांच्यासह ग्रामस्थांनी कर्जत प्रशासकीय भवन गाठले. प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ यांना निवेदन देताना मनोहर वाघमारे, संजय हिलम, रघुनाथ वाघमारे, जिजाबाई सोमनाथ हिलम, सुरेश मुकणे, अमोल मुकणे, संजय मुकणे, नरेश पवार, प्रकाश वाघमारे यांच्यासह शंभरहून अधिक आदिवासी उपस्थित होते.
आदिवासींच्या घरांवर आणि शेतीवर गदा आणून प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न झाल्यास तो कदापि सहन केला जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. “आमच्या हक्काच्या जमिनीवर आमची घरे आहेत. आम्हाला विस्थापित करून प्रकल्प उभारणार असतील तर त्याला तीव्र विरोध करू,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.
दरम्यान, साई डोंगर प्रकल्पासाठी सुमारे 932 एकर जमीन लागणार असल्याचे सांगितले जात असून, त्यातील मोठा भाग वनक्षेत्राचा असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. प्रकल्पामुळे हजारो झाडे, वन्यजीव आणि जैवविविधतेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सह्याद्री पर्वतरांग, भीमाशंकर अभयारण्य परिसर आणि कर्जतच्या पर्यावरणीय समतोलावरही परिणाम होऊ शकतो, असा आरोप पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे आदिवासींच्या हक्कांच्या जमिनीचा प्रश्न आणि पर्यावरणाचा मुद्दा एकाचवेळी ऐरणीवर आल्याने टोरंट प्रकल्पाविरोधातील आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
आमच्या पिढ्यान्पिढ्या या जमिनीवर घरे आणि शेती आहे. याच जमिनीवर आमचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. आमची घरे हटवून किंवा आम्हाला विस्थापित करून टोरंटचा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला तर तो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.
लाखाचीवाडीतील
आदिवासी ग्रामस्थ







