एकाच कार्यक्रमाचे दोन नारळ शेकाप फोडत नाही- पंडित पाटील

| गोवे कोलाड | प्रतिनिधी ।

शेकाप हा श्रमजीवी, कष्टकरी, शेतकरी वर्गासाठी झटणारा व त्यांना वेळोवेळी न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणारा पक्ष आहे. आमदार असो अथवा नसो परंतु जनतेची विकास कामे कधीही आम्ही थांबवित नाही, अथवा एकाच कामाचे दोन दोन नारळ फोडण्याची ही पक्षाची संस्कृती नसल्याचे प्रतिपादन शेकापचे माजी आ. पंडित पाटील यांनी पुगाव येथे केले.

रोहा तालुक्यातील मौजे पुगाव येथे स्व हरिभाऊ म्हसकर यांच्या जन्मशताब्दी प्रित्यर्थ शंकरराव हरिभाऊ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान व ग्रुप ग्राम पंचायत पुगाव तसेच आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर स्व हरिभाऊ म्हसकर सभागृह पुगाव येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते .

यावेळी माजी आ. धैर्यशील पाटील, शंकरराव म्हसकर, शिवराम महाबळे, गणेश मढवी, महादेव मोहिते, मारुती खांडेकर सर, वसंत मरवडे, समीर महाबळे, मनोहर महाबळे, खेळू ढमाल, प्रकाश खांडेकर, बबलू सय्यद, दिवाणशेठ सानप, म्हात्रे, हरिश्‍चंद्र खांडेकर, यशवंत मोंडे, घनश्याम बागुल, तानाजी जाधव, शंकरा आय हॉस्पिटल टीमचे प्रमुख डॉ. प्रकाश पाटील, गंगाराम दळवी, हेमंत ठाकूर, विठ्ठल मोरे, लीलाधर मोरे, सरपंच नेहा म्हसकर, रचना कळमकर, अदिती झोलगे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश म्हसकर, संचालक सुनील म्हसकर बबन म्हसकर आदी ग्रामस्थ व शेकापचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मुबंई गोवा महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत पंडित पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. डागली गेली दहा ते बारा वर्षे या मार्गाचे काम रखडले आहे त्यामुळेच कार्यक्रमास येण्यास उशीर झाला, अशी कबुली त्यांनी त्यांनी दिली. काही शेठ अनेकदा सत्तेत आहेत तरी देखील दुसर्‍यांनी केलेल्या कामांची नारळ फोडण्याची मोठी हौस आहे अशी टीकाही त्यांनी केली. निधी केंद्र सरकार आणि जिल्ह्य परिषदेचा असतांना नारळ फोडण्याची घाई असल्याचे सांगत रायगडचा खासदार दिल्लीत पाठवणे हे शेतकरी कामगार पक्षाच्याच हातात आहे हे कोणीही विसरून जाऊ नये, असा इशाराही त्यांनी विरोधकांना लगावला.

माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी येथील शेतकरी वर्गावर नेहमीच अन्याय होत आहे, आधारभूत शेतकर्‍यांना पाच वर्षातून एकदा नुकसानभरपाई दिली जाते त्यात आता अधिक रक्कम वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे. रखडलेले नुकसानभरपाई लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे सांगितले.

शंकरराव म्हसकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबाराचा प्रारंभ व स्व. हरिभाऊ म्हसकर सामाजिक सभागृह तसेच बौद्ध वाडी येथे बांधण्यात आलेल्या बौद्ध विहार व सामाजिक सभागृहाचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

रायगडचे सात आमदार आहेत मात्र विधानसभेत जनतेचे प्रश्‍न मांडण्यास आवाज नाही तर ते जैसे थे. आम्ही आमदार नसतानाही जनतेचे प्रश्‍न समजून घेऊन सोडवण्याचे प्रयत्न करत आहोत. आम्ही कोणाची जमीन घेत नाही ती शेतकर्‍यांना मिळवून देतो. येथे भीती पोटी रात्रीच नारळ फोडली जातात.

पंडित पाटील
माजी आमदार

कोणत्याही कार्यक्रमाचे फुकटचे श्रेय घेणारा शेतकरी कामगार पक्ष नव्हे. पाटी लावून बॅनर बाजी करून दाखवणारा हा पक्ष नाही तर सर्व सामान्य माणसाच्या हृदयात सामाजिक बांधिलकी जपणारा पक्ष आहे.

धैर्यशील पाटील
माजी आमदार
Exit mobile version