प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामावर प्रश्नचिन्ह; शहराचे दूषित पाणी थेट वाहत्या पाण्यात
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हासनदीला प्रदूषणाचा विळखा बसला आहे. कोल्हारे, नेरळ, ममदापूर आणि शेलू ग्रामपंचायतचे कचरा डेपोतून उल्हासनदीचे पाणी प्रदूषित होत आहे. दरम्यान, उल्हास नदी प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करते? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते गोरख शेप यांनी उपस्थित केला आहे.
कर्जत आणि नेरळ सारख्या शहरातील तसेच कर्जत तालुक्यात नव्याने निर्माण होत असलेल्या वसाहतीमधून निघणारे सांडपाणी ही मोठी समस्या पाणी दूषित होण्यासाठी महत्वाची ठरत आहे. या शहराचे दूषित पाणी थेट वाहत्या पाण्यात येत असल्याने उल्हास नदी आधीच प्रदूषणाच्या विळख्यात असताना या नदीच्या तीरावर असलेले डम्पिंग ग्राऊंड हे देखील उल्हास नदीचे प्रदूषण वाढविणारे ठरू पाहत आहेत.
कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हासनदीच्या तीरावर कोल्हारे ग्रामपंचायतचे डम्पिंग ग्राऊंड असून, त्या अनधिकृतपणे सुरू केलेल्या डम्पिंग ग्राऊंडच्या जेमतेम पाच मीटर वरून उल्हास नदी वाहते. पावसाळ्यात तर कचरा आणि त्यात वर्षातील आठ महिने साठून राहिलेले पाणी हे पाण्याबरोबर वाहून जाणारा कचरा उल्हासनदी आपल्या कवेत घेत असते. त्या ठिकाणी दररोज घंटागाडीमधून कचरा आणून टाकला जात आहे. याबाबत उल्हासनदीच्या पाण्यावर अधिकार असलेल्या पाटबंधारे विभागाला त्याबाबत कोणतेही सोयरसुतक नाही. त्याचवेळी पाणी प्रदूषण होत असताना अनेकदा तक्रारी करून देखील महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रक मंडळ कोणतीही कारवाई करीत नाही.
पुढे नेरळ ग्रामपंचायतचे सांडपाणी दररोज हजारो लिटर ने उल्हास नदीत वाहून येते, त्यावर देखील प्रदूषण मंडळाचे नियंत्रण नाही. नेरळ ग्रामपंचायतचे डम्पिंग ग्राऊंड उल्हासनदीच्या जवळ आहे, त्या कचरा डेपोमधून निघणारा धूर धामोते गाव आणि नवीन वसाहतीमधील लोकांना स्वास्थ्य बिघडवत आहेत. हे डम्पिंग ग्राऊंड हे उल्हासनदीच्या वाहत्या पाण्यापासून 500 मीटर अंतरावर आहे. तर सध्या टाकण्यात येत असलेला कचरा हा ज्या नाल्याजवळ टाकला जात आहे. त्या डम्पिंग ग्राऊंडमधून कचरा हा देखील उल्हासनदीमध्ये वाहून जात आहे.
पुढे ममदापुर ग्रामपंचायतचे डंपिंग ग्राऊंड आणि त्यांची नळपाणी योजना हे आजूबाजूला आहेत. उल्हासनदीच्या पाण्यापासून जेमतेम पाच मीटर अंतरावर हे डम्पिंग ग्राऊंड असून, तेथून वाहणारा कचरा हा खाली नदीमध्ये गेल्यानंतर 20 मीटर अंतरावर ममदापुर आणि दामत-भडवळ गावांच्या नळपाणी योजना आहेत. त्यामुळे त्या दोन्ही नळपाणी योजनांमधून उचलले जाणारे पाणी हे सुरुवातीला अशुद्ध उचलले जाते. त्याबाबत समोर दिसत असून देखील ममदापुर ग्रामस्थ तसेच दामत आणि भडवळ ग्रामस्थ हे शांत राहून अशुद्ध पाणी पीत आहेत.
शेलू गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चाळी बांधल्या गेल्या आहेत. त्यातील सांडपाणी हे तेथून सरळ उल्हासनदीमध्ये जात आहे. पण त्याचे पाटबंधारे विभागाला कोणतेही सोयरसुतक नाही आणि तिकडे प्रदूषण मंडळ कोणतीही कारवाई देखील करीत नाही. त्यामुळे उल्हासनदीच्या तीरावर पाहिले असता आपल्याला ही नदी प्रदूषणकारी बनली आहे याची कल्पना येते. त्याचवेळी शेलू गावातील स्मशानभूमी परिसरात कचरा डेपो बनला आहे.
या सर्वांबाबत प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आधी कठोर होण्याची गरज आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि रायगड जिल्हा प्रशासन यांचे नियंत्रण नसल्याने प्रदूषण वाढत आहे.
गोरख शेप
कार्यकर्ते







