प्रशासन नागरी सुविधा पुरवण्यास असमर्थ
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील उकरूळ ग्रामपंचायत स्वच्छतेचा पुरस्कार करणारी ग्रामपंचायत आहे. मात्र, नव्याने नागरीकरण झालेल्या भागात नागरी सुविधा देण्यात ग्रामपंचायत प्रशासन कमी पडत आहे. जागोजागी कचरा साठून ग्रामपंचायतीची प्रतिमा मालिन होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीकडून येथे कचरा टाकू नये असे फलक लावले आहेत. मात्र, त्याच जागा कचरा कुंड्या बनल्या आहेत.
तालुक्यातील स्वच्छ आणि सुंदर ग्रामपंचायत म्हणून उकरूळ हि ग्रामपंचायतीची ओळख होती. या ग्रामपंचायत परिसरात रेल्वे स्थानक जवळ असल्याने मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. मोठ्या इमारती उभ्या राहिल्याने ग्रामपंचायतीचा महसूल देखील वाढला आहे. मात्र, तरी देखील ग्रामपंचायत प्रशासनाने नागरी सुविधा पुरवत नसल्याचे दिसून येत आहे.
येथे नव्याने इमारती उभ्या राहिल्या आहेत आणि तेथे रहिवाशी राहायला देखील आले आहेत. मात्र, त्या रहिवाशांना कचरा टाकण्यासाठी कचरा कुंड्या नाहीत. कचरा कुंड्या नसल्याने कचरा रस्त्याच्या कडेला टाकून देतात आणि त्यामुळे ग्रामपांचायत मधील अनेक रस्त्यांच्या बाजूला अनधिकृतपणे कचरा कुंड्या निर्माण झाल्या आहेत. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला रहिवाशांनी कुठेही कचरा न टाकण्यासाठी सूचना फलक लावावे लागले आहेत. मात्र, अशाच सूचना फलकांच्या आजुबाजुला कचरा कुंड्या निर्माण झाल्या आहेत.
आमच्या ग्रामपंचायतीचे वार्षिक कर संकलन कमी असल्याने आम्ही घंटागाडी खरेदी करू शकत नाही. त्यामुळे काही महिन्यांनी कचरा उचलून नेत असतो. मात्र, मॅपल सोसायटीजवळ कचरा रस्त्यावर टाकला जातो आणि त्यामुळे तेथे आम्ही सूचना फलक लावले आहेत. तेथे कचरा कुंडी बांधली असून देखील तेथील रहिवाशी कचरा रस्त्याच्या बाजूला टाकतात.
सुधीर लोहकरे,
ग्रामविकास अधिकारी, उकरुल