| पाताळगंगा | प्रतिनिधी |
मोरबे धरणाची उपनदी असलेल्या धावरी नदीत दोन चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाची घटना जांभिवली गावात घडली आहे. ही घटना सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास घडली असून, आरध्या संजय गावडे (5) व आरव विजय गावडे (5) ह्या दोघा भावा -बहिणीचा मृत्यू झाला आहे.
ही दोघे सकाळी आपल्या आई-काकी बरोबर नेहमीप्रमाणे नदीवर कपडे धुण्यास गेले होते. कपडे धुवून झाल्यावर आई-काकी सोबत घरी आले. काही वेळानी ते परिसरात, अथवा कुठे खेळत नसल्याचे दिसल्यावर शोध सुरु झाला. त्यावेळी ते पुन्हा नदीवर गेले का? ही शंका आल्याने नदीवर जाऊन पाहणी केली असता. आराध्या ही पाण्यावर तरंगत असताना दिसली, त्वरित आरव चा शोध पाण्यात घेतला असता, तो पाण्यात चिखलात अडकल्याचे निदर्शनास आले. तात्काळ दोघांनाही चौक येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
ही दुर्दैवी घटना समजताच परिसरातील नातेवाईक, ग्रामस्थ यांच्यात हळहळ व्यक्त करीत आहेत. निरागस बालकांचा मृत्यू झाल्याने घरातील वातावरण शोकात बुडाले आहे. ही नदी खोल आहे, नदीच्या दोन्ही बाजूला उतार असून सर्व भाग खडकाळ आहे. चौकचे सपोनि युवराज सुर्यवंशी वरीष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहे.