| उरण | प्रतिनिधी |
अवकाळी पावसाचा सुक्या मासळीवर परिणाम झाला आहे. मासळी वाळविण्यासाठी ठेवली असता ती काही प्रमाणात वाया गेली आहे. त्यामुळे सुक्या मासळीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
पावसाळ्यात खोल समुद्रातील तसेच खाडीतील मासळीचे प्रमाण कमी होत असल्याने मांसाहार करणारे या कालावधीत सुक्या मासळीवर ताव मारतात. पावसाळा अवघ्या महिन्यांवर येऊन ठेपला असून, सुक्या मासळीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. यामध्ये आंबार, बोंबील जवळा, कोलंबीचे सोडे याला अधिक पसंती दिली जात आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत मासळीची आवक घटल्याने सुक्या मासळीच्या दरात वाढ झाली आहे. याचा फटका खवय्यांना बसत आहे.
उरण तालुक्यातील करंजा, खोपटे, केळवणे, दिघाटी परिसरात अनेक ठिकाणी मासळी सुकवताना दिसून येते. यामध्ये बोंबील, वाकट्यांसह गावाजवळील रस्त्यावर देखील लांबलचक पट्ट्यात जवळा सुकवताना दिसून येतो. तर, सध्या रस्त्याच्या कडेला छोट्या टोपल्या मांडून सुकी मासळी विकण्यात येत आहे. यामध्ये सुकी माखली, पापलेट, शिंगाली, बागडे, मांदेलीचा समावेश आहे. तर जवळा, वाकट्या, कोलंबी सोडे, आंबार याला सर्वाधिक पसंती आहे.
चौकट
सुक्या मासळीचे दर (प्रती किलो)
कोलमाची वडी 50 रुपये (12 नग)
जवळा 200 रुपये
आंबार 400 रुपये
दांडी सुकट 400 रुपये
बोंबील 400 ते 700 रुपये
वाकट्या 200 ते 500 रुपये
माखली 1000 रुपये
पापलेट 600 रुपये
कोलंबी सोडे 1800 रुपये
