| चिरनेर | वार्ताहर |
उरण शहरात सतत होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सिडको कडून मंजूर करण्यात आलेल्या उरण बायपास रस्त्याचे काम आता आणखी रखडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकतेच या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र मंगळवारी उरण परिसरातील मच्छीमारांनी आंदोलन करून या बायपास रस्त्याचे काम बंद पाडले.
मच्छीमारांचे पुनर्वसन करा, पोटावर मारू नका ही मागणी घेऊन उरणच्या मच्छीमारांनी सिडकोच्या उरण बायपास रस्त्याचे काम बंद करून स्वतःला अटक करून घेतली. या मार्गामुळे येथील मासेमारी व्यवसायावर परिणाम होणार असल्याचा दावा मच्छीमारांनी केला आहे. मच्छीमारांच्या मागण्या संदर्भात सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत चर्चा झाली असून मच्छीमारांनी मोबदल्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्याचा निकाल आल्यानंतर सिडकोकडून पूर्तता केली जाईल. तोपर्यंत काम सुरू करण्याची विनंती केली असल्याची माहिती सिडकोचे अभियंता हनुमंत नहाने यांनी दिली.
बाह्य वळण मार्गामुळे मच्छीमारी व्यवसायावर व येथील पर्यावरणावर ही परिणाम होणार असल्याने मच्छीमारांच्या पोटावर मारू नका, काम थांबवा, तसेच कांदळवन परिसरात काम करण्यस बंदी घातली असून मच्छीमार व पर्यावरण वाचवण्याची मागणी मच्छीमारांचे नेते दिलीप कोळी यांनी केली. तर पोलिसांना मच्छीमारांनी सरकारी कामात अडथळा केल्याने अटक केली आहे. त्यांच्यावर या संदर्भात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोर्ट विभागाचे सहाय्यक आयुक्त धनाजी क्षीरसागर यांनी दिली. सध्या या कामाचा खर्च वाढला असून, आता या बाह्य वळण रस्त्याला 47 कोटी रुपये खर्च येणार आहे.