चिरनेरचे प्रफुल्ल खारपाटील तालुक्यात प्रथम, तर रायगडात पाचवे
| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यातील श्री महागणपती सेंद्रिय शेतकरी गटाचे अध्यक्ष तथा कृषी मित्र शेतकरी प्रफुल्ल काळुराम खारपाटील यांनी कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरीय राज्य भातपीक स्पर्धेत मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर 2021-22 व 2022-23 असा सलग दोन वर्षे उरण तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. याच स्पर्धेत ते 2022-23 मध्ये रायगड जिल्ह्यात पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
या भातपीक स्पर्धेसाठी एक गुंठ्याचे क्षेत्र निवडण्यात आले होते. यातून खारपाटील यांनी चालू वर्षी 2022-23 मध्ये सेंद्रिय खताचा व चारसूत्री पद्धतीची लागवड करून एक गुंठ्याच्या क्षेत्रातून 91 किलो ग्राम एवढे भातपिकाचे उत्पादन काढले. त्यामुळे ते उरण तालुक्यात सलग दोन वर्षे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले असून, रायगड जिल्ह्यात त्यांनी पाचवा क्रमांक पटकाविला आहे.
दरम्यान, खांदेश्वर, कामोठे, पनवेल येथे 9 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपसंचालक कृषी श्री. काळभोर, तहसीलदार विजय तळेकर, उपविभागीय कृषी अधिकारी बाळाजी ताटे, तसेच कृषी क्षेत्रातील अन्य मान्यवर उपस्थित होते.
शेतीला आधुनिकतेची जोड
पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत प्रफुल्ल खारपाटील यांनी भातासह अन्य पिकांची लागवड करीत मोठे उत्पादन काढले आहे. सेंद्रीय खत, गांडूळ खताची घरच्या घरी निर्मिती करुन सेंद्रीय शेती करण्यावर त्यांनी अधिक भर दिला आहे. शेततळे, चारसूत्री पद्धतीने शेती लागवड आदी शेतीविषयक प्रयोग त्यांनी शेतीत केले आहेत. पशुपालन व दुग्धव्यवसाय करण्याचा मानसदेखील त्यांनी बोलून दाखविला. दरम्यान, खारपाटील यांची शेतीतील प्रगती अन्य शेतकर्यांसमोर आदर्शवत अशीच आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.