मातीच्या भरावामुळे अनेक गावांना पुराचा फटका
पूरस्थितीला कारणीभूत ठरणार्यांवर कारवाईची मागणी
चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यात जेएनपीटी बंदरातील आयात-निर्यातीच्या अनुषंगाने जेएनपीटीच्या निर्मितीपासून मागील 32 वर्षांत विविध प्रकारची खासगी कंटेनर गोदामे साकारण्यात आली. त्याासाठी तालुक्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचे भराव करण्यात आले. या भरावांमुळे तालुक्याला पुराचा फटका बसत आहे. त्यामुळे पूरस्थितीला कारणीभूत ठरणार्या खासगी गोदम आणि विकासकांवर कारवाई करण्याची मागणी उरणकरांकडून होत आहे.
दरम्यान, खासगी गोदामे निर्मितीसाठी भरावांना लागणारी माती सर्रास जासई, जांभुळपाडा, दिघोडे, विंधणे, चिरनेर, कंळबसरे, वशेणी, पिरकोन, सारडे, आवरे व अन्य उरण पूर्व विभागातील गाव परिसरातील डोंगरातून पोकलेनच्या सहाय्याने काढून नेल्याने त्यामध्ये अनेक प्रकारची औषधी वनस्पती उद्ध्वस्त करण्यात आली. याशिवाय आजतागायत वाढत्या गोदामांच्या भरावासाठी नियमित मातीचे उत्खनन करण्यात येऊन भरावाची कामे सुरूच आहेत.
त्याचप्रमाणे सध्या याच उरण तालुक्यातील पूर्व विभागात विविध ठिकाणी तथाकथित विकासकांकडून सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करण्यात येत आहे. परिणामी, कंटेनर गोदामे आणि तथाकथित विकासक यांच्याकडून करण्यात येत असलेल्या मातीच्या भरामुळे पाण्याचा निचरा करणारे नैसर्गिक नाल्याचे स्रोत बंद झाल्याने येथील गावातीला घरांना पुराच्या पाण्याचा फटका बसू लागला आहे.
दरवर्षी पावसाळ्यातील होत असलेल्या अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान आणि त्यावर कोणती उपाययोजना करावी, यासाठी राज्यकर्त्यांना वेळच नाही. घटना, दुर्घटना घडेल तेवढ्यापुरती वचनपूर्ती केली जाते. मात्र, दरवर्षी तालुक्यात होणार्या प्रचंड प्रमाणातील मातीचे भराव यांना आळा घालण्यासाठी शासनाकडून प्रयत्नदेखील होत नसल्याने गावपरिसरातील गरीब व सामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे अशा मातीच्या भरावांमुळे होणार्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी शासन स्तरावर योग्य ती पाहणी करून पूरपरिस्थितीला कारणीभूत ठरणार्या कंटेनर गोदाम आणि इतर कामासाठी भराव करणार्यांवर कठोर कारवाईची मोहीम हाती घेण्यात यावी, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.