तृणधान्याचे क्षेत्र पाच हजार हेक्टर वाढवणार

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे प्रतिपादन

| रायगड | खास प्रतिनिधी |

बदलत्या काळात सुदृढ आरोग्यासाठी आहारात तृणधान्यांचा वापर वाढवण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेले काम उल्लेखनीय आहे. तृणधान्याखालील क्षेत्र हे आगामी दोन वर्षात पाच हजार हेक्टर होण्यासाठी कृषी विभाग, जिल्हा प्रशासन आणि शेतकरी यांच्या सहकार्याने विशेष भर देण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.

कृषि विभागाच्या जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले, आदिवासी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, समन्वय अधिकारी स्मार्ट प्रकल्प सतीश बोर्‍हाडे, कृषी विकास अधिकारी मिलिंद चौधरी, उपविभागीय कृषी अधिकारी नितीन फुलसुंदर, प्रकल्प उपसंचालक आत्मा भांडवलकर उपस्थित होते.

संयुक्त राष्ट्र संघटनेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मागणीनुसार 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. या अंतर्गत तृणधान्याचे उत्पादन वाढविणे, त्याच्या पदार्थांचे आहारातील प्रमाण वाढविणे यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तृणधान्याच्या वापर व उत्पादन वाढीसाठी रायगड जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत. तसेच, विविध माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. या वर्षभरात राबविलेल्या कार्यक्रमांमुळे तृणधान्याचे आहारातील प्रमाण वाढले आहे, असे जावळे यांनी स्पष्ट केले. तसेच, मोठ्या प्रमाणात तृणधान्यावरील प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे उत्पादन वाढले असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्र हे स्टार्टअप हब आहे. राज्यात नवनवीन उद्योजक तयार होत आहेत. रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी कृषी क्षेत्राशी संबंधित उद्योग सुरु करावेत. तसेच, शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा वापर केला पाहिजे. पारंपरिक शेती पद्धतीमध्ये परिवर्तन करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू या असे सांगून जावळे यांनी कृषी विभागाला सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.

यावेळी कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यांनी तृणधान्य विषयी जागृती करण्यासाठी तसेच, मागील आर्थिक वर्षात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रम यांची माहिती दिली. समन्वय अधिकारी स्मार्ट प्रकल्प, सतीश बोर्‍हाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या निमित्ताने तृणधान्यांपासून बनविलेल्या पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलला जिल्हाधिकारी जावळे यांनी भेट दिली. तसेच, शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त शेतकर्‍यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. तसेच, कृषी विभागाच्या योजनानाची माहिती, तृणधान्यापासून विविध पाककृतीची माहिती देणार्‍या पुस्तकिचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Exit mobile version