कांद्याच्या लागवड क्षेत्राची केली पाहणी
। रायगड । प्रतिनिधी ।
जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या विशेष प्रकल्पांतर्गत पांढर्या कांद्याच्या बिजोत्पादनास प्रोत्साहन दिले जात आहे. अलिबाग येथील शेतकर्यांच्या बांधावर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भेट देत पिकाच्या सद्यःस्थितीची माहिती घेतली. सध्या 50 टक्के पीक फुलोर्याच्या टप्प्यात असून, यंदा चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. पांढर्या कांद्याच्या लागवड क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी शेतकर्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले. अलिबागमधील प्रकल्पाचे लाभार्थी सागावचे शेतकरी सतीश शामराव पाटील यांनी लागवड केलेल्या अलिबागच्या पांढर्या कांद्याची जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पाहणी केली.
विशिष्ट चव, उत्कृष्ट गुणवत्तेसाठी आणि आरोग्यविषयक फायद्यासाठी हा कांदा प्रसिद्ध आहे. कांद्याला भौगोलिक (जी आय) मानांकन मिळाल्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढली आहे. मात्र, दर्जेदार बियाण्यांच्या मर्यादित उपलब्धतेमुळे ही लागवड क्षेत्राच्या विस्तारासाठी अडचणीची ठरत आहे. शेतकर्यांची समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली, कृषी विभागाने बियाणे उत्पादनासाठी नावीन्यपूर्ण प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प वैज्ञानिक पद्धतीने राबविला जात असून, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी अधिकार्यांचे नियमित मार्गदर्शन लाभत आहे.
च्या
प्रकल्पाचे क्षेत्र तीन हेक्टर जमिनीवर पसरले असून, अलिबाग तालुक्यातील अनेक गावांचा समावेश आहे. अलिबागच्या पांढर्या कांदा उत्पादक गटाच्या मदतीने 259 शेतकर्यांची निवड करण्यात आली आहे. ही भेट शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी आणि अलिबागच्या पांढर्या कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरली. जावळे यांनी शेतकर्यांच्या प्रयत्नांचे आणि कृषी विभागाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक केले. त्यांनी शाश्वत शेतीचे महत्त्व स्पष्ट केले आणि शेतकर्यांना जीवामृत, बीजामृत यांसारख्या सेंद्रिय निविष्ट व जैविक उत्पादनांचा उपयोग करण्यास प्रोत्साहन दिले. मातीचा पोत सुधारण्यासाठी, पिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि सुरक्षित, उच्च दर्जाच्या भाजीपाला उत्पादनासाठी हे घटक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. अलिबागमधील पांढर्या कांद्याचे लागवड क्षेत्र दुप्पट करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, यासाठी सरकारी पातळीवरून पूर्ण मदत मिळेल, असे आश्वासन जावळे यांनी दिले. जिल्हाधिकार्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करीत शेतकरी व कृषी विभागाच्या संयुक्त प्रयत्नांचे कौतुक केले. शेतकर्यांनी सेंद्रिय शेती पद्धती अवलंबून उत्पादनाची गुणवत्ता सुधारावी आणि टिकाऊ शेती साधावी, असा सल्लाही दिला. बियाणे उत्पादन तंत्र सुधारण्यासाठी त्यांनी तांत्रिक मार्गदर्शनही केले आणि शेतकर्यांनी प्रकल्पाचा अधिकाधिक फायदा घ्यावा, असे आवाहन केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड वंदना शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी अलिबाग कैलास वानखेडे, उपसंचालक कृषी प्रवीण ठिगळे, तालुका कृषी अधिकारी तन्मय भगत, मंडळ कृषी अधिकारी नागाव मोहन सूर्यवंशी, कृषी सहाय्यक प्रल्हाद बनबरे आणि नितल ढोक उपस्थित होते. प्रगतशील शेतकर्यांनीही चर्चेत सहभाग घेतला आणि प्रकल्पाच्या यशस्वितेबाबत विचार मांडले. या वेळी सतीश कृष्णा म्हात्रे, संदीप वामन वाडेकर, स्वप्नील पांडुरंग पाटील शेतकरी हजर होते.