अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील मल्याण येथील जय हनुमान क्रिकेट संघाच्यावतीने सरपंच चषक ही दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात कुरुळ येथील व्हीएसएन संघ विजेता ठरला. या स्पर्धेत एकूण 24 संघाने सहभाग घेतला होता. या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत खुल्या गटातील 8, गाव टू गाव 8 आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संघातील 8 संघामध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी कुरुळ येथील व्हीएस एन संघ व नवगाव येथील माऊ इलेव्हन या संघामध्ये झाला.
कुरुळ येथील संघाने सुरुवातीला फलंदाजी स्विकारली. नवगाव येथील संघासमोर एक षटकामध्ये 22 धावांचे आव्हान ठेवले होते. परंतू नवगाव संघ हे आव्हान पेलण्यास अपयशी ठरल्याने अंतिम सामन्याचा मानकरी व्हीएसएन कुरुळ संघ ठरला. या संघाला प्रथम क्रमांकाचे 51 हजार 111 रुपये व चषक, नवगाव येथील माऊ इलेव्हन संघाला द्वीतीय क्रमांकाचे 31 हजार 111 रुपये व चषक व भोनंग येथील श्री गणेश संघाला तृतीय क्रमांकाचे 15 हजार 111 रुपये व चषक देऊन सन्मानित केले. तसेच उत्कृष्ट गोलदांज मंथन शेळके, उत्कृष्ट फलंदाज विनोद वाटकरे व मालिकाविर म्हणून प्रसाद पाटील या खेळाडूंना गौरविण्यात आले. सिक्स किंग, चौकार किंग, बेस्ट कॅच घेणार्या खेळाडूंचाही यावेळी सन्मान करण्यात आला. या संघाला अलिबाग पंचायत समिती माजी सदस्य श्रीधर भोपी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले .राजा ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी बेलोशी ग्रामपंचायतीचे कृष्णा भोपी, गिरीश पाटील, भास्कर भोपी, संदीप भोईर, अनंत औचटकर, माजी सदस्य रामचंद्र पारंगे, राकेश भोपी, महेंद्र पाटील, संस्कार म्हात्रे आदी मान्यवर व खेळाडू व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.