पोलीसांचे नियंत्रण नसल्याने अपघाताच्या तीव्रतेमध्ये भयावहता
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर जवळील कशेडी घाटातील तीव्र वळण उताराचे रस्ते चौपदरीकरण होऊनही अद्याप अपघातप्रवण असल्याचे गेल्या 24 तासांत 5 अपघात झाल्याने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गापर्यंत पोहोचण्याआधी अथवा भुयारी मार्गाने पोलादपूरच्या दिशेने येताना अपघातप्रवण क्षेत्र चौपदरीकरणानंतरही कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्ग अपघातप्रवण क्षेत्र नसण्याची अपेक्षा प्रवासी व स्थानींकडून व्यक्त होत आहे.
भोगाव कातळीच्या हद्दीतील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्ग शनिवारपासून पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. परंतु, मुंबईकडे जाण्यासाठीच्या भुयारात कोकणाकडे जाणारी आणि मुंबईकडे जाणारी वाहने आमनेसामने येत आहेत. कातळात भुयार खणण्याचे काम पूर्ण होऊनही तीनशे मीटर कृत्रिम भुयार काँक्रीटमध्ये करण्याचे काम पोलादपूर बाजूला अपूर्ण असल्याने कोकणाकडे जाणार्या भुयाराची निर्मिती अद्याप पूर्ण झाली नाही. त्यामुळे या भुयारी मार्गातील वाहनांचा प्रवास केवळ कोकणात जाण्यासाठी न होता मुंबईकडे जाण्यासाठी होत असल्याने भुयारामध्ये अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. भुयारात वाहतूक पोलीसांचे नियंत्रण नसल्याने अपघाताच्या तीव्रतेमध्ये भयावहता असू शकणार आहे.
दोन पैकी केवळ एकाच भुयारी मार्गाचा वापर मागील गणेशोत्सवाप्रमाणे सुरू झाला असताना आता शिमगोत्सवाच्या पार्श्वभुमीवर पुन्हा त्याच भुयारी मार्गाचा गणेशोत्सवाप्रमाणे ‘वनवे’ वापर न होता दुहेरी वाहतूकीसाठी वापर गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू झाला आहे. या भुयाराबाहेर काही कामगार वाहतुक नियंत्रण करताना दिसून येत असून खेडबाजूकडे फायबरचे अडथळे करून तीनपदरी भुयारापैकी केवळ एकावेळी एकच पदर वापरण्यासाठी निर्बंध केले जात आहे. मात्र, वाहनाचालकांकडून पुन्हा खेडबाजूच्या खवटी गावासमोरून वळसा घालून पुन्हा कशेडी घाटामध्ये येण्याऐवजी त्याच भुयारातून मार्गस्थ होताना भुयारातील कामगार हे वाहतूक पोलीस नसल्याने त्यांनी केलेल्या मज्जावाला धुडकावून भुयारामध्ये प्रवेश करीत पोलादपूरच्या दिशेने मुंबईकडे रवाना होण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याने भुयारामध्ये कोकणात जाणारी आणि मुंबईकडे जाणारी वाहने आमने-सामने येत असल्याचे दिसून येत आहे.
पोलादपूर तालुक्याच्या बाजूला कोकणात जाणार्या भुयाराच्या प्रवेशाद्वारापासून कातळ फोडून सुरू झालेल्या भुयारापर्यंत सुमारे 300 मीटर्स लांबीचे आणि 20 मीटर्स रूंदीचे काँक्रीटचे कृत्रिम भुयार बांधले जात आहे. भुयाराच्या कामाचा दर्जा व गुणवत्ता नियंत्रण होण्याची आवश्यकता असूनही ते निष्पक्षपणे कसे होईल, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.