ठाण्यातील आरोग्यसेवेवर मोठा प्रश्नचिन्ह; कर्मचाऱ्यांचा पगारही रखडला
| ठाणे | प्रतिनिधी |
नागरिकांना त्यांच्या घराजवळ मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजना आता कोलमडली आहे. एकेकाळी नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी उचलणारी ही केंद्रे आता बंद पडल्याने, ठाण्यातील आरोग्यसेवेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिकेने शहरभर सुरू केलेल्या 50 केंद्रांपैकी तब्बल 40 दवाखाने बंद झाले असून, काही ठिकाणी या बंद केंद्रांचे रूपांतर व्यापारी आस्थापनांत झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एका ठिकाणी तर दवाखान्याचे साडीच्या दुकानात रूपांतर झाल्याने नागरिक आणि राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे.
ठाण्याची लोकसंख्या तब्बल 26 लाखांवर पोहोचली असून, त्यातील 52 टक्क्यांहून अधिक नागरिक झोपडपट्ट्यांमध्ये आणि चाळी त राहतात. आरोग्य नियमांनुसार, दर 30 ते 40 हजार लोकसंख्येमागे एक आरोग्य केंद्र आवश्यक असते. मात्र, सध्या ठाण्यात एक आरोग्य केंद्र दीड लाख लोकांची सेवा करत आहे.
या योजनेचा करार ऑक्टोबर 2025 पर्यंत असतानाही, ऑगस्ट महिन्यातच सर्व केंद्रे अचानक बंद करण्यात आली. कर्मचाऱ्यांना मागील 6 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. परिणामी, सणासुदीच्या काळात अनेक कर्मचाऱ्यांना बेरोजगारी आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आ. संजय केळकर यांच्या उपस्थितीत जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात नागरिक आणि माजी कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा मांडली.
परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा पर्दाफाश करत तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली. ठाणे महानगरपालिकेच्या धोरणांवर थेट टीका करताना सांगितले, महापालिका ही प्रयोगशाळा नाही की इच्छेनुसार योजना सुरू आणि बंद केल्या जातील. नागरिकांना प्रतीकात्मक नव्हे तर स्थिर आणि विश्वासार्ह आरोग्यव्यवस्था हवी आहे. ते पुढे म्हणाले, काही ठिकाणी बंद दवाखान्यांचे व्यापारी आस्थापनात रूपांतर झाले आहे. एका ठिकाणी तर साडीचे दुकान सुरू झाले आहे. प्रशासनाने तत्काळ कारवाई केली नाही, तर ही जागा कायमस्वरूपी खासगी स्वार्थाच्या ताब्यात
जाऊ शकते.
महापालिकेचे मौन कायम
या सर्व घडामोडींवर ठाणे महानगरपालिकेकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. ‘आपला दवाखाना' योजनेचे भवितव्य, कर्मचाऱ्यांचे थकित वेतन आणि आरोग्यसेवा पुन्हा सुरू होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे नागरिकांना अजूनही मिळालेली नाहीत. दरम्यान, ठाण्यातील नागरिकांकडून या योजनेच्या पुनरुज्जीवनाची आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची जोरदार मागणी केली जात आहे.





