| चिरनेर | वार्ताहर |
चिरनेरमधील इतिहास संशोधक तथा ज्येष्ठ साहित्यिक वसंत भाऊ पाटील (वय 86) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गुरुवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास चिरनेर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळामुळे त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती औषध उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत नसल्यामुळे, त्यांना घरी सोडण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर चिरनेर येथील मुक्तीधाम स्मशानभूमीत सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी मीरा पाटील, कन्या मयुरी, जावई व नातवंडे असा आप्तपरिवार आहे.
वसंत पाटील यांनी अलिबाग येथील कोएसोच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून अध्यापनाचे काम केले. हे अध्यापनाचे काम करत असताना, त्यांना साहित्याचा लळा लागला. आणि त्यांच्या लेखणीतून, दर्जेदार साहित्य बाहेर पडले. ते इतिहासाचे गाढे अभ्यासक होते. इतिहास संशोधक व प्रतिभावंत लेखक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांना अनेक राज्यस्तरीय मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांचे मुक्त पत्रकारितेतील लेखन सकस व वास्तवदर्शी होते. विविध व्यक्तीमहत्त्वांची व्यक्तिचित्रे त्यांच्या लेखणीतून उतरली आहेत. विविध वृत्तपत्रातून वेगवेगळे विषयांवर त्यांनी समीक्षा लेख लिहिले आहेत. इतिहासाचे वास्तवदर्शी सौंदर्य उलगडणार्या वसंत पाटील यांनी आस्वादक समीक्षेचा वस्तुपाठ प्रस्थापित केला.
उरण पूर्व साहित्य संस्थेचे त्यांनी अनेक वर्ष अध्यक्षपद भूषविले होते. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक साहित्य संमेलने भरविली गेली होती. चिरनेर जंगल सत्याग्रहाचा खरा इतिहास त्यांनी चिरनेर जंगल सत्याग्रह 1930 या ऐतिहासिक पुस्तकातून वाचकांसमोर आणला. चिरनेर जंगल सत्याग्रह या लढ्याची माहिती व पुरावे गोळा करण्यासाठी त्यांनी पनवेल, ठाणे, मुंबई व परिसरातील गावागावात फिरून या ऐतिहासिक लढ्याची खरी माहिती गोळा करून, 1930 चा. चिरनेर जंगल सत्याग्रह या लढ्याचे हे पुस्तक प्रकाशित करून, हा ऐतिहासिक लढा उजेडात आणण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या साहित्य प्रवासात चिरनेर जंगल सत्याग्रह 1930, हिंदू धर्म संग्राम आणि वनवासींचे जीवन, श्री महागणपती चिरनेर, गाजलेले सत्याग्रह दांडी ते चिरनेर, सत्याग्रहाची हुतात्मा स्मारके, हुतात्म्या नाग्या कातकरी रायगड जिल्ह्यातील ठाकर व कातकरी, सुगीच्या दिनाला व चिरनेर सत्याग्रहाचा हुतात्मा स्मृतीदिन अशी अनेक पुस्तके त्यांच्या लेखणीतून प्रकाशित झाली आहेत.
हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा स्मृतिदिन ते वनवासी कल्याण आश्रमाच्या व आदिवासी बांधवांच्या सहकार्यातून, अक्कादेवी शौर्याच्या रणभूमीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते दरवर्षी साजरा करीत असत. त्यांच्या अंत्यविधीला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.