। पनवेल । वार्ताहर ।
उरण शिक्षक सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनलने शिक्षक महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत दणदणीत विजय संपादित केला. रविवारी (दि.26) झालेल्या निवडणुकीत स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनलने 15 पैकी 15 जागा जिंकून दैदिप्यमान यश प्राप्त केले. परंतु मंगळवारी (दि.28) भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा आधार घेत अत्यंत चुकीची व दिशाभूल करणारी बातमी अग्रगण्य दैनिकात छापून आल्याने या निवडणुकीला भलताच रंग प्राप्त झाला. स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनलचे वतीने सुभाष हिरा भोपी, जयदास घरत आणि नरेश मोकाशी यांनी संयुक्तपणे पत्रक प्रसिद्ध करून यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातमीवरून नाराजी व्यक्त केली आहे. या वृत्तात कोकण शिक्षक आ.बाळाराम पाटील यांना धक्का बसला असल्याचे कपोलकल्पित छापले आहे. या संघटना शिक्षकांच्या न्याय्य हक्कासाठी लढत असतात. त्यांचा कुठल्याही राजकीय पक्षाशी अर्थाअर्थी संबंध नाही. मुळात निवडणूक जाहीर झाल्यानंतर या दोन्ही संघटनांनी शिक्षकांचे प्रतिनिधी या नात्याने आमदार बाळाराम पाटील यांचे आशिर्वाद घेतले होते. आ.बाळाराम पाटील यांनी दोन्ही संघटनांना सारखार पाठिंबा दिला होता आणि केलेल्या कामाच्या जोरावर निवडणूक लढवावी अशी सूचना केली होती.
स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनल यांस पनवेलच्या भाजपच्या आमदारांचे छुपे पाठबळ असल्याच्या वृत्ताचाही संघटनेच्या प्रवक्त्यांनी प्रसिद्धीपत्रकात इन्कार केला आहे. या पतपेढीत गेली पंधरा वर्षे हे पॅनल अत्यंत प्रामाणिकपणे काम करत असल्याने शिक्षक सदस्यांनी त्यांच्यावरती भरघोस मतदानाचा वर्षाव केला. सदर पॅनल ने बहुसंख्य सभासदांच्या हितासाठी पनवेल येथे शाखा सुरू केली, मयत सभासदास संपूर्ण कर्ज माफी योजना यशस्वीपणे राबविली, संस्था संपूर्ण कर्जमुक्त केली, कर्ज मर्यादा वाढवून व्याजदर कमी केला. या आणि अशाच अनेक विधायक कामामुळे स्वाभिमानी शिक्षक मित्र फायनल भरघोस मतांनी विजयी झाले असल्याचा दावाही केला आहे.