पाण्यासाठी हंडामोर्चाचा इशारा

| पनवेल । वार्ताहर ।

पनवेल तालुक्यातील वळवली-टेभोंडे गाव गेल्या 15 दिवसापासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. या ठिकाणी पाण्याचा प्रश्‍न गंभीर स्वरूप धारण करू नये म्हणून पालिकेने लवकरात लवकर पावले उचलावीत अन्यथा शिवसेनेच्या वतीने पालिकेवर हंडामोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख विश्‍वास पेटकर यांनी पनवेल महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग उपअभियंता श्री. सावंत यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनात पेटकर यांनी म्हटले आहे की, पनवेल तालुक्यातील वळवली-टेभोंडे गाव गेल्या 15 दिवसापासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. पनवेल महानगरपालीकेकडून तुटपंजा पाणीपुरवठा होत असून पाण्याचा मुद्दा एरणीवर आला आहे. गावात पाण्याचा व्यवस्थितपणे नियोजन होत असताना अचानकपणे गेल्या 15 दिवसापासून गावात पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहे. याप्रकरणी वळवली-टेभोंडे गावाचा पाण्याचा प्रश्‍न गंभीर स्वरूप धारण करू नये म्हणून लवकरात लवकर पाऊले उचलावीत यासाठी निवेदन दिले आहे. जर पाण्याचा प्रश्‍न सुटत नाही तर महाविकास आघाडीच्यावतीने पनवेल महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदार महापालिका असेल असा इशारा दिला आहे. यावेळी दिलीप पाटील,  भारती पेटकर, धनश्री पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version