चार गावे आणि 11 आदिवासी वाड्यांची टँकरची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
दुर्गम भाग मोठ्या प्रमाणात असलेल्या कर्जत तालुक्यातील पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. सध्या सात गावे आणि चार आदिवासी वाड्यांना शासनाच्या टँकरमधून पाणी पुरवठा होत आहे. मात्र पाणीटंचाई एवढी वाढली आहे की तालुक्यातील चार गावे आणि 11 आदिवासी वाड्यामध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करणारे प्रस्ताव कर्जत पंचायत समितीकडे पोहचले आहेत.
कर्जत तालुक्यात दरवर्षी निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेवून शासनाने पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. त्यात संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावे 18 असल्याचे आणि संभाव्य पाणीटंचाईग्रस्त वाड्यामध्ये तब्बल 60 वाड्यांचा समावेश आहे. यावर्षी पाणीटंचाईचे दुर्भिक्ष नेहमीपेक्षा लवकर जाणवू लागल्याने एक एप्रिल रोजी कर्जत तालुक्यात पहिला टँकर शासनाच्या माध्यमातून सुरू झाला आहे. आतापर्यंत तालुक्यातील सात गावे आणि चार आदिवासी वाड्या यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात दरवर्षी तीव्र पाणीटंचाई असलेल्या ताडवाडी, मोरेवाडी, धाबेवाडी आणि बांगरवाडी येथे जलजीवनमधील नळपाणी योजना सुरू झाल्याने त्या चार वाड्या टँकरमुक्त झाल्या आहेत. मात्र तरीदेखील दुर्गम आणि आदिवासी भागातील पाणीटंचाईची स्थिती यावर्षी अधिक नाजूक आहे. सध्या तालुक्यातील आषाने, मोग्रज, किरवली, खांनद, वर्णे, पिंगळस आणि मोहोपाडामध्ये शासनाच्या दोन टँकरमधून पाणी पुरवठा नियमित सुरू आहे. मात्र, तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे जलस्तोस्त्र यांची स्थिती बिकट झाली आहे. बहुसंख्य विहिरी आटल्या असून अनेक बोअरवेल पाणी तळाशी गेल्याने नादुरुस्त झाल्या आहेत. त्यात जलजीवन मिशनमधील नळपाणी योजना यांची कामे रेंगाळली असल्याने पाण्याची स्थितीत दिवसेदिवस बिकट होत आहे. सध्या तालुका पंचायत समिती कडून 12 हजार लिटर क्षमतेच्या टँकरमधून पाणीपुरवठा केला जात आहे.
परंतु पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर झाल्याने तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमधून पाण्याचे टँकर शासनाने पुरवावे, अशी मागणी होत आहे. त्यात खासगी संस्था यांच्याकडून देखील टँकर ग्रामीण आणि आदिवासी भागात सुरू आहेत. परंतु तरीदेखील पाणी टंचाई कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. पिण्याचे पाणी मिळावे यासाठी तालुक्यातील सहा ग्रामपंचायतमधील चार गावे आणि 11 आदिवासी वाड्याचे प्रस्ताव कर्जत पंचायत समितीकडे पोहचले आहेत. त्या सर्व ठिकाणी शासनाचे टँकरमधून पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. कर्जत पंचायत समितीकडून हे सर्व प्रस्ताव तालुका उपविभागीय अधिकारी यांच्या मंजुरीसाठी पाठवले असल्याची माहिती मिळाली आहे. तालुक्यातील कळंब ग्रामपंचायतमधील मिरचुलवाडी, मोग्रज ग्रामपंचायतमधील आंबिवली, खांडस ग्रामपंचायतमधील पेटार वाडी, वडाची वाडी, टेपाचीवाडी, पादीरवाडी, मेंगाल वाडी, जांभूळवाडी तसेच, नांदगाव ग्रामपंचायतमधील मोहपाडा, अंभेर पाडा ग्रामपंचायतमधील बेलाची वाडी, काठे वाडी, आंभेर पाडा, तर बोरिवली ग्रामपंचायतमधील सुगवे, नालधे, सराई वाडी येथे पिण्याचे पाण्याची टंचाई तीव्र झाली असल्याचे अहवाल स्थानिक ग्रामपंचायतकडून कर्जत पंचायत समितीकडे पोहचले आहेत. मात्र गेल्या सहा दिवसात कर्जत पंचायत समिती तसेच, उपविभागीय अधिकारी कार्यालयाने टँकर मंजूर केलेले नाहीत. त्यामुळे तेथील रहिवाशी आणि ग्रामस्थ महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण वाढली आहे.