अलिबाग-विरार बहुउद्देशीय प्रकल्पाचा मोबदला वापट सुरू
| पेण | प्रतिनिधी |
अलिबाग-विरार बहुउद्देशीय प्रकल्प ठाणे आणि रायगड जिल्ह्यात प्रस्तावित असून, या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मालकांना मोबदला वाटपाचे काम सुरू आहे. निवडणुकीच्या काळात मोबदला वाटप करणे म्हणजे आचरसंहितेचा भंग नाही का, असा सवाल शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाला केला. तात्काळ पैशांचे वाटप थांबविणे गरजेचे आहे, अन्यथा हा पैसा मतदारांना आमिष दाखवण्यासाठी वापरला जाण्याची भीतीदेखील आ. पाटील यांनी व्यक्त केली.
आ. जयंत पाटील यांनी शुक्रवारी (दि. 3) पेणमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी ही धक्कादायक बाब सर्वांच्या निदर्शनास आणली. ते म्हणाले, निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना अचानक अलिबाग-विरार बहुउद्देशीय प्रकल्पाच्या जमीन मालकांना पैशाचा वाटप करणे हे चुकीचे आहे. कारण, वाटप केलेला पैसा हा जमीन मालकांचा नसून, या प्रकल्पातील जमिनी गुंतवणूकदाराने घेतलेल्या असल्याने हा पैसा या गुंतवणूकदारांकडे जाणार आहे आणि हाच पैसा शेवटच्या दोन दिवसात मतदारांना वाटण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या काळात अशाप्रकारे जमिनीचा मोबदला वाटप करणे म्हणजेच अचारसंहितेचा भंग करणे होय.
पुढे भाईंनी सांगितले की, दोन्ही जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता हा पैशांचे वाटप करणे म्हणजे एकप्रकारे हे मोठे षड्यंत्र आहे. मात्र, याकडे निवडणूक आयोग कानाडोळा का करत आहे, हे न समजणारे कोडे आहे. जवळपास 200 कोटी रुपये जमिनीच्या मोबदल्याचे देण्याची हालचाल सुरु असल्याने निवडणूक आयोगाने तातडीने जमिनीच्या मोबदल्याच्या पैशाचे वाटप थांबविणे गरजेचे आहे, अन्यथा हा पैसा मतदारांना आमिष दाखविण्यासाठी वापरला जाईल, अशी भीती प्रसार माध्यमांशी बोलताना आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासमवेत शेकाप युवा नेते अतुल म्हात्रे, जिल्हा परिषद मा. सभापती महादेव दिवेकर, महिला आघाडी प्रमुख स्मिता पाटील, प्रल्हाद पाटील आदी उपस्थित होते.