पावसाळी पर्यटनाचा पर्यटकांना आनंद; ताम्हिणी घाट, सुधागडात गर्दी वाढली
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आणि हा अवकाळी मुसळधार पाऊस थांबायचे नाव घेत नाही. परिणामी, ठिकठिकाणी आता धबधबे वाहू लागले असून, उन्हाळ्यात पर्यटक पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना दिसत आहे. ताम्हिणी घाट, सुधागड व इतर डोंगराळ प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात धबधबे वाहताना दिसत आहेत.
या अवकाळी पावसामुळे येथील सृष्टी न्हाऊन निघाली आहे. तसेच वातावरणात आल्हाददायक बदल झाले आहेत. वातावरणात गारवा पसरला आहे. शिवाय, प्राणी-पक्षीदेखील सुखावले आहेत. अवकाळी पावसामुळे नागरिक तसेच पशुपक्ष्यांनाही वाढत्या उष्म्यापासून दिलासा मिळाला आहे. नागरिकांना गारव्यामुळे सुखद अनुभूती मिळाली. पावसामुळे पशुपक्षीदेखील आनंदी आहेत. त्यांनाही पाण्याची मुबलक उपलब्धता निर्माण झाली आहे.
काळ्या पांढऱ्या ढगांची जुगलबंदी
पावसामुळे आकाशात काळे, पांढरे, राखाडी छटा असलेले ढग एकमेकांत गुंफलेले दिसतात. कुठे काळ्या ढगांच्या गर्दीत पांढऱ्या ढगांचे हलके फुलकीदार थर, तर कुठे काळ्या पांढऱ्या ढगांचे विलक्षण आकार लक्ष वेधत आहेत. ढगांच्या समूहातून सूर्याच्या किरणांचे झोत बाहेर पडताना दिसत आहेत, जणू स्वर्गाच्या दारात उघडलेली एक नैसर्गिक कलाकृती. ढगांच्या या अनोख्या जुगलबंदीमुळे आभाळ एक जिवंत चित्रपटाच्या पडद्यासारखे भासते. शिवाय, विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट ही होत आहे.
खाद्य व पाण्याची उपलब्धता
वळीवाचा पाऊस किंवा अवकाळी पाऊस आला असला तरी या पावसामुळे मुंग्या व वाळवी यासारखे प्राणी सक्रीय झाले आहेत. तसेच सरडे, खेकडे, पाली व बेडूक हे देखील बाहेर पडतात. हे सर्व प्राणी अनेक पक्ष्यांचे आवडीचे भक्ष्य असते. त्यामुळे अवकाळी पावसामुळे पक्ष्यांना खाद्याची मात्र चांगली उपलब्धता झाली आहे. तसेच पावसामुळे अनेक ठिकाणी डबकी, नदी ओहोळ यांच्यात काही प्रमाणात पाणी साठले आहे. त्यामुळे पक्ष्यांसह इतर प्राण्यांचीही पाण्यासाठी वणवण थांबली आहे. याशिवाय गवतदेखील उगवले आहे.
आल्हाददायक वातावरणाने पर्यटक सुखावले
उन्हाच्या काहीलीने तापून निघालेली सृष्टी अवकाळी पावसामुळे आता थंड झाली आहे. सर्वत्र गारवा पसरला असून, वातावरण आल्हाददायक झाले आहे. परिणामी, रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आलेले पर्यटकदेखील सुखावले असून, पर्यटनाचा आनंद घेत आहे. मुसळधार पाऊस आल्यास मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू लागतात आणि त्यामुळे पर्यटक आणि नागरिक या धबधब्यांचा आनंद घेतात.
सध्याच्या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी जंगल परिसरात लागलेले वणवे पूर्णपणे थांबले आहेत. वातावरणातील प्रदूषके खाली बसून प्रदूषण कमी झाले आहे. असहाय्य होत असलेल्या उन्हाळ्याच्या गर्मीमध्ये वातावरणात गारवा आला आहे. पशु-पक्ष्यांनादेखील गारवा व पाण्याची उपलब्धता झाली आहे.
शंतनु कुवेसकर,
निसर्ग व पशुपक्षी अभ्यासक, माणगाव
अवकाळी पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. सतत पाऊस पडल्यामुळे आता नदी नाले व ओहोळ यांना पाणी आले आहे. परिणामी, डोंगर उतारावरूनदेखील मोठ्या प्रमाणावर पाणी वाहते. त्यामुळे ठिकठिकाणी धबधबे ओसंडून वाहात आहेत. यामुळे पर्यटक मात्र सुखावले आहेत. ताम्हिणी घाटात वाहणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून थांबतात.
ऋषी झा,
कृषी सल्लागार, पाली