। अलिबाग । प्रतिनिधी ।
आपल्या सर्वांना आणि लाल बावट्याला एक ढाल बनून गोरगरीबांच्या संरक्षणासाठी उभे राहायचे आहे, असे प्रतिपादन शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले आहे. शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा पक्ष संघटना आणि विविध जन आघाड्यांचा पदाधिकारी निवड मेळावा रविवारी (दि.18) सायंकाळी पेझारी येथील भैरवनाथ युवक मंडळ पटांगणात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, आपल्यासमोर प्रश्न खूप आहेत; परंतु, आपल्यासमोरची माणसे काही ठिक नाहीत. तालुक्याचे विद्यमान आमदारांचा बॉडीगार्ड दरोडेखोर, चालक विनयभंगाच्या केसमध्ये अडकलेला आहे. आमदारांकडून पत्रकारांचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलीस यंत्रणेला सांगायचे आहे, की तुम्ही सिंघम आहात. तुम्ही घाबरु नका. तुम्ही कायद्यात खरे आहे तेच करा आणि गोरगरीबांच्या पाठीशी उभे राहा. पक्षासाठी चीड, पक्षासाठी प्रेम असणारे निष्ठावान कार्यकर्ते आज याठिकाणी उपस्थित आहेत. आज पक्ष नव्या दमाने, नव्या उमेदीने उभा राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, शेतकरी कामगार पक्षासाठी हा मेळावा फार महत्त्वाचा आहे. जुन्या-नव्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सांगड घालून ज्यांची ज्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्याचा मला आनंद आहे. त्यामुळे आता जुन्या-नव्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. रायगडात नवनव्या डेव्हलपमेंट येत असताना इथल्या भूमीपुत्रावर अन्याय होणार नाही, यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहायचे आहे. शेतकरी कामार पक्षाचा सुवर्ण इतिहास होता. तो पुन्हा मिळवून देण्याची जबाबदारी आपली असून, त्यासाठी त्वेषाने, चिडीने काम करायचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

कार्यकर्त्यांना उभारी देण्याची संधी या मेळाव्याच्या माध्यमातून मिळाली. पेझारी ही क्रांती भूमी आहे. त्याच भूमीतून प्रेरणा घेऊन प्रत्येक कार्यकर्त्यांनी जोशाने काम करायचे आहे. उद्याचा कालखंड हा संधीचे सोने करण्याचा असणारा आहे. कार्यकर्ते पेटून उठले आहेत. जनतेच्या हितासाठी काम करण्याचा वसा पुढे न्यायचा आहे. जिल्ह्यात अनेक अडचणी, समस्या आहेत. ज्यांना निवडून दिले ते मशगूल आहेत. नैनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमीनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुंबई उर्जा टॉवर उभारले जात आहे. शेतकऱ्यांच्या जमीनी जात आहेत. सत्तेतील आमदारांकडे या प्रश्नाबाबत शेतकरी गेले. त्यावेळी आमदारांनी केंद्राचा प्रकल्प आहे, आपण काही करू शकत नाही, असे सांगून जबाबदारी झटकली. जनतेच्या प्रश्नांना न्याय देणे हे आपले व्रत आहे. दि. बा. पाटील विमानतळामध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्या, ही शेतकरी कामगार पक्षाची भुमिका आहे. आंदोलनाच्या माध्यमातून पक्षाची ताकत दाखवून शेतकऱ्यांना न्याय देणे गरजेचे आहे. हा लढा तीव्रतेने लढण्याचे नियोजन करायचे आहे. त्यासाठी स्वस्थ बसून चालणार नाही. आगामी काळ निवडणुकांचा असणार आहे. निवडणुका लढायच्या आणि जिंकायच्या आहेत.
माजी आमदार बाळाराम पाटील