स्थानिकांचा प्रशासनाला संतप्त सवाल
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यात माथेरानच्या डोंगरातून वाहणारे पाणी नेरळमधील दोन मोठ्या नाल्यांमधून उल्हास नदीकडे वाहत जाते. त्या नाल्यांतुन पावसाळ्यात वाहणाऱ्या पाण्याचा जोर मोठा असतो. त्यामुळे नेरळ गावातून वाहणाऱ्या नाल्यांची सफाई करण्याची आवश्यकता असते. मात्र, काही दिवसांवर पाऊस येऊन ठेपला असताना ग्रामपंचायतीने नालेसफाईची कामे हाती घेतली नाहीत. पावसाळ्यात नाले आणि गटारे तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नेरळ गावातील नालेसफाई कधी, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत प्रशासनाला केला जात आहे.
नेरळ गावाच्या मागे असलेल्या माथेरान डोंगरातून वाहनारे पाणी हे नेरळ गावातून जात असते. नेरळ गावातील दोन भागातून हे नाले वाहत असतात. ग्रामपंचायत प्रशासनाकडून या नाल्यांची साफसफाई करण्याची कामे केली जातात. मात्र, यावर्षी पाऊस काही दिवसांवर येऊन ठेपला असतांना नेरळ गावातील नाल्यांची सफाई करण्यात आलेली नाही. तसेच, या नाल्यांच्या सफाईची कामे नेरळ ग्रामपंचायत करणार की नाही, याची देखील माहिती देण्यात येत नाही. त्यामुळे पावसळ्यात नेरळ गावातील नाले भरून त्याचे पाणी नागरी वस्तीत घुसून नुकसान करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील तिन्ही प्रमुख नाल्यांची लांबी साधारण आठ किलोमीटर लांबीची आहे. मात्र, काही दिवसांवर पाऊस आला असूनही या नाल्यांची साफसफाई झालेली नाही. त्याचवेळी नेरळ गावातील रस्त्याच्या बाजूने वाहणाऱ्या गटारांची देखील साफसफाई झालेली नाही. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीचे धोरण काय? हे देखील ठरलेले दिसत नाही. ग्रामपंचायतीवर प्रशासकीस राजवट असताना प्रशासक दहा-दहा दिवस ग्रामपंचायत कार्यालयात येत नाहीत. त्यामुळे येथील विकास कामे खोळंबून राहिली असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये होत आहे.
नेरळ गावात पूर्वी मे महिना सुरु झाला की नाल्यांची आणि गटारे साफ करण्याची कामे सुरु व्हायची. मात्र, यावर्षी अद्याप गटारे साफ करण्याची कोणतीही कार्यवाही सुरु झालेली नाही. त्यामुळे गटारे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरून वाहणार आहेत. त्याचवेळी गटाराचे पाणी घरांमध्ये घुसण्याची शक्यता आहे. मोठ्या ग्रामपंचायत मध्ये सदस्य मंडळ नसल्याने काय काय होऊ शकते हे सध्याच्या प्रशासकीस राजवट पाहिल्यावर प्राधान्याने दिसून येत आहे. मात्र, या कामाचे ग्रामपंचायत प्रशासनाला विसर पडला असल्याचे दिसून येत आहे.
राम हिसालके,
सामाजिक कार्यकर्ते