। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल हे एकेकाळी येथील तलावांचे गाव म्हणून प्रसिद्ध होते. सध्या मात्र पनवेल फक्त एका तलावासाठी लोकांना माहिती आहे, ते म्हणजे बल्लाळेश्वर अथवा वडाळे तलाव. पनवेल महानगरपालिका झाल्यापासून येथील आयुक्त तसेच राजकारण्यांना पनवेल येथील फक्त आणि फक्त बल्लाळेश्वर तलाव एवढी एकच वस्तू सुशोभीकरणासाठी दिसत आहे. बल्लाळेश्वर तलाव सुशोभीकरणावर इतका जोर लावलाय की विचारता सोय नाही. अर्थात, हे सुशोभीकरण म्हणजे तलावाच्या नैसर्गिक सौंदर्याला बाधा करूनच फक्त कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने सिमेंट काँक्रिट वापरून त्याचे रूपांतर अनैसर्गिक पार्कमध्ये बदलण्याचा घाट घातला आहे, असा आरोप पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.
सध्या तलावात विदेशी पाणवनस्पती पसरल्या असून, महानगर पालिकेने निवडलेल्या कॉन्ट्रॅक्टरला मोठी सुट्टी देण्यात आली आहे की काय, असा सवाल इथे येणारे नागरिक विचारत आहेत. एकमेव जैवविविधता असलेला तलाव मृत करण्याच्या मागे हात धुवून लागलेली महानगरपालिका लवकरच या कामात यशस्वी होणार आहे. याबाबत अनुभूती संस्थेचे सुदीप आठवले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सततचा पाठपुरवठा केल्यानंतरही अधिकारी पुढे काहीच हालचाल करत नाहीत. कॉन्ट्रॅक्टरला पुढे करून चालढकल करत आहेत, आम्ही स्वतः कॉन्ट्रॅक्टरला भेटून स्वेच्छेने मदत करायला तयार असून आणि कटेकर या अभियंत्यास भेटून तलावास कसे आणि कोणते जीव असावेत हे कळवले आणि गरज पडेल तशी सर्व मदत करण्याची तयारी दाखवूनसुध्दा आत्तापर्यंत कुणीही संपर्क साधलेला नाही. तलावात याच प्रमाणात विदेशी पाणवनस्पती राहिल्या तर लवकरच बल्लाळेश्वर तलाव मच्छर उत्पादन केंद्रात बदलेल आणि पनवेलच्या नागरिकांना पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना बळी पडायला लागेल. पनवेल महानगरपालिकेच्या अधिकारी यांना पनवेलच्या नागरिकांच्या आणि बल्लाळेश्वर तलावाबद्दल काहीच पडलेले नाही, असेच यावरून स्पष्ट दिसून येत आहे, असा आरोप आठवले यांनी केला आहे.