कर्जतमध्ये रानभाज्या महोत्सवाचे आयोजन

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील जंगल भागात आढळणाऱ्या रानभाज्या यांचे महत्व मानवी जीवनावर आहे. त्या दृष्टीने रानभाज्या यांची मागणी मोठ्या प्रमाणावर असून, रानभाज्या यांचे महत्व विषद करण्यासाठी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

कर्जत येथील क्रांतीज्योती आदिवासी महिला सामाजिक संस्था आणि अत्तदीप एज्युकेशन फाऊंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत तालुक्यातील किकवी-बोरवाडी येथे रानभाजी महोत्सव’ आयोजित केला होता. रानभाज्यांचे संवर्धन, ठाकूर आणि आदिवासी समाजाच्या पारंपरिक ज्ञानाचा सन्मान तसेच विषमुक्त, रासायनमुक्त नैसर्गिक अन्नाबाबत जनजागृती हा महोत्सवाचा उद्देश ठेवून आयोजित केलेल्या रानभाज्या महोत्सवात असंख्य प्रकारच्या भाज्या मांडण्यात आल्या होत्या. यावेळी अत्तदीप एज्युकेशन फाऊंडेशनच्या डॉ. सुजाता खांडेकर तसेच कृषी सहाय्यक अधिकारी सरडे यांनी कृषीविषयक मार्गदर्शन केले.

या रानभाज्या महोत्सवात सुमारे 20 आदिवासी वाड्यांतील महिलांनी पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या विविध रानभाज्यांपासून तयार केलेले पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थांचे आकर्षक प्रदर्शन भरविले. चव, पौष्टिकता, पारंपरिकता, सजावट आणि सादरीकरणाच्या माध्यमातून महिलांनी आपल्या बोलीभाषेत रानभाज्यांचे वनौषधी गुणधर्म आणि आरोग्यदायी महत्त्व प्रभावीपणे मांडले. रानभाज्यांमधील नैसर्गिक औषधी गुणधर्म, पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन आणि हे ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सर्वांनी आरोग्य, पोषण आणि पारंपरिक खाद्यसंस्कृती जपणाऱ्या उपक्रमांचे नियमित आयोजन करण्याचा संकल्प केला.

Exit mobile version