‘जय भवानी’ शब्द हटवणार नाही: उद्धव ठाकरे

| मुंबई | प्रतिनिधी |

शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रचारासाठी एक प्रेरणागीत नुकतेच प्रसारीत केले आहे. त्या गीतातील दोन शब्द हटवण्यासाठी निवडणूक आयोगाने शिवसेनेला नोटीस पाठवली आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी निवडणूक आयोगाला ठणकावले आहे. आम्ही धर्माच्या आधारावर मते मागितली नाहीत. हिंदू या शब्दाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. तसेच जय भवानी, जय शिवाजी हा महाराष्ट्राचा जयघोष आहे. त्यामुळे या प्रेरणा गीतातील हे शब्द कोणत्याही परिस्थितीत हटवण्यात येणार नाही. आमच्यावर कारवाई करायची असेल तर आधी धर्माच्या नावाने प्रचार करणार्‍या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर कारवाई करा, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले आहे. मुंबईतील मतोश्री या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपले मते मांडली.

आमच्या मशाल चिन्हाच्या गीतामध्ये ‘जय भवानी, जय शिवाजी’ असं एक कडवं आहे. त्यातील जय भवानी हा शब्द काढण्याचा फतवा निवडणूक आयोगाकडून काढण्यात आला आहे. पण, आम्ही कोणत्याही परिस्थितीत भवानी हा शब्द काढणार नाही. आमच्यावर कारवाई करणार असाल तर मोदी-शहा यांच्यावरही तुम्ही कारवाई करणार आहात का? हे आम्हाला सांगावं. मोदी-शहांमध्ये महाराष्ट्रातील देवांबाबत इतका द्वेष आहे हे आता कळत आहे, असं ते म्हणाले आहेत. आमची निशाणी बदलली आहे. प्रेरणा गीत आहे. प्रेरणेसाठी एक गीत लागतं. मशाल चिन्ह घेऊन एक गीत बनवलं आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही गीत घेऊन गेलो होतो. निवडणूक आयोगाने आम्हाला दोन शब्द काढण्यास सांगितले आहेत. गीतामध्ये ’हिंदू तुझा धर्म, जाणून घे हे मर्म, जीव त्यास कर तू बहाल’ असं कडवं आहे. यातील हिंदू शब्द काढण्यास सांगितलं आहे. हिंदू धर्म काढायला लावणे योग्य आहे का? असा सवाल ठाकरेंनी केलाय. आम्ही हिंदू धर्माच्या आधारावर मत मागितलं नाही. आम्ही हिंदूत्व सोडलं म्हणणार्‍यांनी आणि निवडणूक आयोगाने आम्हाला उत्तर द्यावं. बजरंग बली की जय म्हणून बटन दावा असं म्हटलं जातंय. आम्ही देखील बजरंगबलीचे भक्त आहोत.

महाराष्ट्रामध्ये आई तुळजा भवानी कुलदैवत आहे. तुळजा भवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना आर्शीवाद दिला आहे. जय भवानी, जय शिवाजी ही घोषणा लोकांच्या मनामनात आहे. आम्हाला निवडणूक आयोगाला आठवण करुन द्यायचं आहे. उद्या जर आम्ही हर हर महादेव किंवा जय भवानी, जय शिवाजी असं म्हटलं तर चालेल का? आम्ही हे बोलणारच आहोत यावर कुणाचा आक्षेप असायला नको, असं ते म्हणाले.

Exit mobile version