। मुंबई । वृत्तसंस्था ।
बंडखोरीनंतर राज्याचे मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडल्यानंतर आता शिंदे गटाला आणखी एक लॉटरी लागण्याची शक्यता आहे. नुकताच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. त्यानंतर आता शिंदे गटाला केंद्रातही कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेनाच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर सेनेच्या 18 पैकी 12 खासदारांनीदेखील शिंदे गटाची साथ पकडली आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर याबाबतची चर्चा सुरू होती या भूमिकेसाठी नेमकं काय बक्षीस दिलं जाईल आणि मंत्रीपद दिलं जाईल का? त्यात नुकतीच नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरसुद्धा एनडीएचा सर्वात मोठा घटक पक्ष शिंदे गट उरला असून, त्यांचे 12 खासदार आहेत.
त्यामुळे आता चर्चा अशी सुरू झाली आहे की, हिवाळी अधिवेशनापूर्वी शिंदे गटाला एखादं कॅबिनेट मंत्रिपद केंद्रातदेखील मिळू शकतं. यासाठी शिंदे गटाकडून बुलढाण्याचे ज्येष्ठ खासदार प्रतापराव जाधव यांचे नाव यासाठी चर्चेमध्ये असून, एखादं राज्यमंत्री पद किंवा राष्ट्रीय पातळीवर एखाद्या कमिटीचं अध्यक्षपद हे देखील शिंदे गटाला दिले जाण्याची शक्यता आहे.