बाळाराम पाटील यांचे प्रतिपादन
। पेण । प्रतिनिधी ।
मिळणारा आमदार निधी फक्त आणि फक्त शैक्षणिक क्षेत्रासाठी वापरला असल्याचे प्रतिपादन शेकाप आ. बाळाराम पाटील यांनी केले. आमदार निधीतून रायगड जिल्हयातील 320 शाळांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम पेण येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आ.धैर्यशील पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य डी.बी.पाटील, माजी सभापती नारायण डामसे, प्रभाकर (हरीओम) म्हात्रे, गोपाळ पाटील, प्रसाद भोईर, देवा पाटील, स्वप्निल म्हात्रे, यशवंत म्हात्रे, यांच्यासह महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यापुढे मार्गदर्शन करताना बाळाराम पाटील यांनी सांगितले की, कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये आमदार म्हणून काम करण्याची संधी शिक्षकांनी दिल्यानंतर शैक्षणिक कार्यासाठी निधीचा वापर करण्याचे धोरण ठरविले होते. सहा वर्षाच्या काळात कोकणातील प्रत्येक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याच्या स्वरुपात पोहचावे, यासाठी कायम प्रयत्न केले. तसेच मिळणारा निधी हा शाळा व शिक्षक यांच्यासाठी खर्च करायचा निर्धार केल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
ते पुढे म्हणाले की, शिक्षणक्षेत्रात योगदान देण्यासाठी केवळ एकट्याच्या निधीवर थांबलो नाही. तर, अन्य आमदार, खासदार यांच्या मदतीनेही निधी उपलब्ध केला. शाळांची संख्या आणि निधी याचा विचार करता आपण पूर्णतः यशस्वी झालो, असे म्हणता येणार नाही. परंतु, यशस्वी होण्याच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत. ग्रामीण भागात असणार्या दुर्गम शाळांना शैक्षणिक साहित्य दिल्याने नक्कीच त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्टया मदत होते, याचे समाधान वाटत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्हयात एकूण 320 शाळांना शास्त्र विषयासाठी लागणारे साहित्य व भुगोल विषयासाठी लागणारे साहित्य पुरविले आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये प्रयोगशाळा साहित्य, संगणक, प्रिंटर यासारखे साहित्यदेखील पुरविले असल्याचे त्यांनी सूचित केले.
निवडणुका डोळयासमोर ठेऊन साहित्य वाटप केले नाही. निवडणुका दोन दिवसाच्या असतात. निवडणुका झाल्यावर सर्व विसरुन सर्व संघटनांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असते. हीच बाब ध्यानात घेउन शिक्षक आमदारांना एकत्र करीत शिक्षकांसाठी काम करायला सुरुवात केली आहे. कोकण शिक्षक मतदार संघ मोठा आहे. त्यामुळे सर्व शाळांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे.
आ. बाळाराम पाटील, शेकाप
चांगल्या लोकप्रतिनिधींची जपणूक करणे हे मतदारांच्या हातात असते. आज सगळ्याच शिक्षकांनी बाळाराम पाटील हे चांगले लोकप्रतिनिधी असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांचे कौतुक. मात्र त्यांची जपणूक करणे हे आपल्या हातात आहे.
– धैर्यशील पाटील, माजी आमदार
वेतन न मिळणार्या शिक्षकांना न्याय देणार
काही शैक्षणिक संस्था शिक्षकांना किमान वेतन कायद्यानुसारही पगार देत नसून त्यांची पिळवणूक करत आहेत. काही संस्था शिक्षकांना किमान वेतन कायद्याने पगार देत नसतील तर अशा शैक्षणिक संस्थाच्या अध्यक्षांशी चर्चा केली जाईल. तसेच शिक्षकांना किमान वेतन कायद्यानुसार पगार कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करुन त्यांना न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाहीही बाळाराम पाटील यांनी दिली.