हिवाळी रानफळांना बहर

| माणगाव । वार्ताहर ।
हिवाळा सुरू झाला की सर्वांना वेध लागतात ते गुलाबी थंडीचे आणि या थंडीच्या दिवसात खायला मिळणार्‍या विविध रान फळांचे.नुकतीच थंडीला सुरुवात झाली असून खास हिवाळ्यातील रानफळांचे आगमन सुरू झाले आहे. उन्हाळ्यात ज्याप्रमाणे रानावनात आंबे , जांभूळ,काजू ,इत्यादी रानफळे खावयास मिळतात तसेच खास हिवाळी दिवसातही विविध प्रकारच्या रानफळांना बहर येत असतो. यामध्ये बोंडे, आवळा, बोरे ,चिंच इत्यादी फळांचा समावेश होतो. चवीला गोड नसणारी आंबट, तुरट वर्गात मोडणारी ही फळे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे सर्वांसाठी खास आकर्षणाचा भाग आहेत. पावसाळा संपल्यानंतर सुरू होणार्‍या थंडीच्या मोसमातील पौष्टिक व आरोग्यवर्धक फळे म्हणून ही फळे प्रसिद्ध आहेत.पावसाळ्यानंतरच्या वाढणार्‍या उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर व थंडीच्या मोसमात ही फळे तयार होतात.

आवळा ,बोरे ,चिंच ही आंबट चवीसाठी प्रसिद्ध असून खास हिवाळ्यात तयार होणारी बोंडे ही तुरट- राकट चवीसाठी प्रसिद्ध आहेत.हिवाळ्यातील थंडीचे हे दिवस रान बोरांसाठी प्रसिद्ध आहेत. काटेरी अशा बोरीच्या झाडांवर आढळणारी बोरे पक्व होण्यास सुरुवात झाली असून बाजारात पाच ते दहा रुपयांना पुरचुंडीमध्ये ती विकली जात आहेत. कोकणातील रानावणात होणारी ही बोरे खास वाळवून मीठ लावून उन्हाळी दिवसांसाठीही ठेवली जातात.यात बी मध्ये असणारे गरही खास खाण्यासाठी चविष्ट असतात. लहान मुले आवर्जून हे गर फोडून खातात. खाडी पट्ट्यातील टपोर्‍या बोरांचे खवय्यांना खास आकर्षण असते. बोरा प्रमाणेच या दिवसात आंबट- चिंबट अशा चिंचांचा मोसम सुरू झाला आहे आकडेवाल्या, लांबसडक चिंचांनी चिंचेची झाडे लगडलेली दिसून येत आहेत.याच दिवसातील चिंचांचा स्वाद घेणे, मिठासोबत खाणे अनेक जण पसंत करतात. पूर्ण परिपक्व झालेल्या चिंचांचा मोसम सुरू होत असून खवय्यांना आंबट चव देणार्‍या चिंचांची बोंदुके भुरळ घालत आहेत. चिंचेचा कोळ तयार करणे चिंचोके तयार करणे इत्यादी कामे या दिवसात घरोघरी केली जातात. या उद्योगातून अनेक कुटुंबांना अर्थाजनही प्राप्त होत असते.

बोरी चिंचाप्रमाणे बाजारात आवळा उपलब्ध झाली आहेत. भरपूर प्रमाणात फ जीवनसत्व देणारी आवळे शंभर रुपये किलो प्रमाणे विकले जात आहेत. आवळ्याचा पेठा,लोणचं, चवनप्राश इत्यादी बनविण्याकडे गृहिणीनी पसंत दिली आहे.हिवाळी दिवसात रानात मिळणारे व सर्वांच्या पसंतीस उतरणारेरणारे फळ म्हणजे बोंडे होत. बोंडीच्या झाडावर हिवाळी दिवसात होणारे हे फळ खायला तुरट -राकट असते. मात्र उन्हामध्ये पूर्ण वाळवल्यानंतर याच्यामध्ये येणारा गोडवा अवर्णनीय असतो. आदिवासी बांधवांना या फळांच्या मळा तयार करून चांगले अर्थाजनही मिळते.

या फळाप्रमाणेच रानावनात या दिवसात आमटीची फळे काळेटीची फळे इत्यादी फळे तयार झाली असून खास रानमेवा म्हणून ती प्रसिद्ध आहेत.जंगलातील वनवे आणि वृक्षतोड यामुळे या रानमेवांच्या झाडांची संख्या कमी होत असली तरी या रान फळांचा गोडवा आणि चव खवळ्यांच्या जिभेवर कायम रेंगाळत असते.अशा या खास दिवाळी दिवसातील रानफळांची सध्या सर्वत्र चर्चा असून या रानफळांना चांगली मागणी आहे.ही फळे खास क जीवनसत्व देणारी असून थंडीच्या दिवसांत उत्तम आरोग्यासाठी ही फळे खाणे आवश्यक असल्याचे जाणकार सांगतात.

हिवाळ्यातील रानफळे तयार झाली असून खास रानमेवा म्हणून ती प्रसिद्ध आहेत. जंगलातील वनवे आणि वृक्षतोड यामुळे या रानमेवांच्या झाडांची संख्या कमी होत असली तरी या रान फळांचा गोडवा आणि चव खवय्यांच्या जिभेवर कायम रेंगाळत असते. खास आंबट चवीसाठी ही फळे प्रसिद्ध आहेत. – संतोष पोटले, स्थानिक नागरिक.

Exit mobile version