एटीएममधून पैसे काढणे महागणार

1 मेपासून इंटरचेंज शुल्कात वाढ

| मुंबई | प्रतिनिधी |

राष्ट्रीय बँकांसह आता सहकारी आणि पतपेढी बँकांनीदेखील एटीएम सेवा सुरू केल्याने आता गाव तिथं एटीएम पाहायला मिळत आहे. बँकेत जाऊन रांगेत उभे राहून पैसे काढण्यापेक्षा हवे तेवढे आणि गरज असेल तेव्हा बँकेतून पैसे काढण्यासाठी एटीएम ही उत्तम सेवा आहे. आता, याच एटीएम ग्राहकांसाठी 1 मे पासून नियमांत बदल होत आहे. म्हणजेच, एटीएम चार्जमध्ये यापुढे बदल होत आहे.

आरबीआयकडून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) च्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आल्यानंतर आता दुसर्‍या बँकेच्या एटीएम मशिनमधून पैसे काढणे महागणार आहे. 1 मे पासून हा बदल लागू होणार आहे. त्यानुसार, ठरवून दिलेल्या लिमिटनंतर दुसर्‍या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास आता 17 ऐवजी 19 रुपये चार्ज लागणार आहे. तसेच, बॅलेन्स चेक करण्याचा चार्ज देखील 7 रुपयांवरन 9 रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, सध्या बँकांकडून दुसर्‍या बँकेतील एटीएममधून पैसे काढण्यासाठी मेट्रो शहरात 5 आणि नॉन मेट्रो शहरात 3 व्यवहार मोफत दिले जात आहेत. मात्र, तीनपेक्षा जास्त व्यवहारांवर चार्ज लावण्यात येतो.

एटीएम चार्ज वाढवल्याने एटीएम नेटवर्क ऑपरेटर आणि व्हाईट लेबल एटीएम कंपन्यांकडून इंटरचेंज फीस वाढविण्याची मागणी होत आहे. सध्या, त्याचे मेन्टेनन्स आणि ऑपरेशन खर्च पूर्वीच्या तुलनेत वाढलेले आहेत. त्यातच, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून ही मागणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासमोर ठेवण्यात आली आहे. त्यास, आरबीआयने ग्रीन सिग्नल दिला आहे.

डिजिटल व्यवहार करणे फायदेशीर
एटीएम सेवा दरात झालेली वाढ लक्षात घेता ग्राहकांनी आता ज्या बँकांचे एटीएम वापरतो, त्याच बँकांच्या एटीएममधून पैसे काढावे किंवा युपीआय पेमेंटच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केल्यास एटीएम चार्जपासून सुटका करुन घेता येईल.
Exit mobile version