। ठाणे । प्रतिनिधी ।
सी. पी. तलाव कचरा संकलन केंद्रावर सोमवारी (दि. 31) जेसीबीच्या धडकेत कचरावेचक महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजश्री जाधव (48) असे मृत महिलेचे नाव असून ती वागळे भागातील जयभीम नगर येथे राहत होती.
ठाण्यात संकलित होणारा कचरा सी. पी. तलाव येथे आणून त्याचे वर्गीकरण केले जाते. त्यासाठी 70 ते 80 महिला तेथे रोज हे काम करतात. राजश्री जाधव ही वर्गीकरणाचे काम करत असताना सोमवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास तेथे असलेल्या जेसीबीचा धक्का तिला लागला. यात गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी श्रीनगर पोलिसांनी जेसीबीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.