| तळा | वार्ताहर |
तालुक्यातील मौजे कोणथरे गावाने स्त्रियांच्या बाबतीत ऐतिहासिक निर्णय घेतला असून गावातील विधवा स्त्रियांना जाचक सामाजिक बंधने व रुढीतून मुक्त करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
श्री काळभैरव उत्सवानिमित्त ग्रामविकास मंडळ कोणथरे, मुंबईकर मंडळ कोणथरे, ग्रामस्थ मंडळ कोणथरे व महिला मंडळ कोणथरे यांची संयुक्त वार्षिक सर्वसाधारण सभा काळभैरव मंदिर सभागृहात संपन्न झाली. सामाजिक सुधारणांचा ध्यास घेतलेल्या तळा तालुक्यातील या लहानशा खेड्यात सामाजिक कार्यातील विधवांचे स्थान सौभाग्यवतींप्रमाणे संपन्न असावे आणि खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता जोपासली जावी यासाठी विधवा प्रथेच्या अनुषंगाने निर्माण झालेले गैरसमज, जाचक रूढी बंद करण्याचा क्रांतिकारी व धाडसी निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यामुळे विधवा स्त्रीचे जीवन अधिक स्वायत्त व सुंदर होण्यास मदत होणार आहे.
याप्रसंगी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष लिलाधर बाईत, मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बाईत, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष किसन बाईत व महिला मंडळाच्या अध्यक्षा हर्षाली आडीत तसेच गावातील ज्येेष्ठ सभासद साधुराम पिंपळे, चंद्रकांत कोतवाल उपस्थित होते. उत्तम परंपरांचे वहन आणि समाजविघातक प्रथांचे उच्चाटन याकरिता कोणथरे गाव नेहमीच उत्तम कार्य करीत आहे. त्यामुळे तालुक्यात सर्व स्तरांतून कोणथरे गावचे कौतुक होत आहे.